विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांचा अविश्वास

0
13

मुंबई,दि.06 – विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी सोमवारी अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासह ३५ आमदारांच्या सह्या आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आपणास बोलू दिले जात नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सोमवारी कामकाज सुरू झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरून भाजपा सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दोन्ही सभागृहांतील प्रमुख नेत्यांची संयुक्त समिती नेमण्याची सूचना केली. अजित पवारांनी ती तात्काळ मान्य करत, कामकाज सुरू करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
तहकुबीमुळे संतापलेल्या विरोधकांची विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली. त्यात अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय झाला. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. विधिमंडळाचे सभागृह सार्वभौम असून विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना मते मांडण्याची संधी द्यायला हवी. परंतु बागडे यांची वर्तणूक सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षासारखी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची वागणूक हुकुमशाही प्रवृत्तीची आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. सत्तेतील शिवसेना कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेत नाही. ते वेळोवेळी भूमिका बदलत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. नाणार प्रकल्पाबाबत सभागृहात चर्चा झाली नव्हती. पण त्यावर त्याच दिवशी उद्योगमंत्र्यांनी जे उत्तर दिले होते ते त्यांच्या पक्षाच्या अंगलट आले. म्हणून आज सुभाष देसाई यांनी त्या विषयावर निवेदन केले. पण मुख्यमंत्री फडणवीस शोकप्रस्ताव मांडत असताना तो बाजूला सारुन उद्योगमंत्र्यांनी निवेदन केले.