सरकारच्या हलगर्जीपणाचा कळस, पानसरेंचं पार्थिव तासभर विमानतळावर रखडलं

0
7

कोल्हापूर-पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाने गळा काढणार्‍या राज्य सरकारच्या हलगर्जीपणाने कळस गाठलाय. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या मारेकर्‍यांना पकडण्याचं आश्वासन देत आहेत. तर दुसरीकडे सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे कॉम्रेडांचं पार्थिव विमानतळावर तासभर रखडलं होतं. शरमेची बाब म्हणजे यावेळी एकही सरकारी अधिकारी विमानतळावर उपस्थित नव्हता.

आधी डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि आज ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्राच्या विरोधातील शक्तींच्या भ्याड हल्ल्यात बळी ठरले आहे. राज्यभरात पानसरेंच्या हत्येचा निषेध व्यक्त केला जातोय. पण दुसरीकडे पानसरे यांचं पार्थिव मुंबईहुन कोल्हापूरला नेण्यासाठी विमानतळावर राज्य सरकारच्या अनास्थेचा प्रताप पाहणास मिळाला. पानसरेंचं पार्थिव कोल्हापूरला नेण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. पण पार्थिव पाठवताना काळजी घेतली गेली नाही. सरकारचा वतीने कोणताही प्रतिनिधी विमानतळावर हजर नव्हता. एकटे तात्याराव लहानेंना सगळ्या गोष्टी एकट्याला कराव्या लागल्या. या गोंधळामुळे जवळपास तासाभरासाठी पानसरेंचं पार्थिव विमानतळावर रखडलं असा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपील पाटील यांनी केलाय. शुक्रवार रात्रीपासून पद्मश्री पुरस्कार प्राप्त तात्याराव लहानेंसारखा माणूस झोपलेला नाही. आणि या नंतर ते पुन्हा जे.जे.मध्ये जाऊन 200 ऑपरेशन कऱणार आहेत. त्यांनाही या सगळ्या त्रासाला सामोरं जाव लागतंय असंही पाटील म्हणाले. विमानतळावर कोणताही सरकारी अधिकारी सोयिस्कर पार पाडण्यासाठी विमानतळावर नव्हता असा दावाही पाटील यांनी केलाय.