26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विपुल वनसंपदेचा कृती आराखडा वन अधिकारी परिषदेतून राज्याला मिळावा :...

महाराष्ट्राच्या विपुल वनसंपदेचा कृती आराखडा वन अधिकारी परिषदेतून राज्याला मिळावा : ना. सुधीर मुनगंटीवार

0
26

औरंगाबादमध्ये दोन दिवसीय वरिष्ठ वन अधिकारी परिषदेला सुरुवात

औरगांबाद,दि.२६ः महाराष्ट्रात विपुल जलसंपदा निर्माण होऊन पर्यावरणाचा समतोल साधला जावा, वनयुक्त महाराष्ट्राची आखणी आणि या माध्यमातून समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीचा आराखडा तयार व्हावा. ही वन अधिकारी परिषदेची कायम चौकट असावी, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात 14 वी वरिष्ठ वन अधिकारी परिषद सुरु झाली. त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच विकास खारगे, सचिव (वने), उमेश कुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वन संरक्षक, (वनबल प्रमुख) , अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण), शेषराव पाटील प्रधान मुख्य वन संरक्षक, अशरफ, रामबाबु व सर्व वरिष्ठ वन अधिकारी यांची उपस्थिती होती याशिवायऔरंगाबाद आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) , तेलंगणा राज्य आर.एल. डोब्रीयाल देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी या वर्षीच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा संदर्भ देताना वृक्ष वाढ हीच हमी युक्त पावसाची नांदी ठरेल असे स्पष्ट केले. देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले असून वन युक्त महाराष्ट्र ही गरज असल्याचे सांगितले.
वरिष्ठ वन अधिकारी परिषद दर 2-3 महिन्यांनी वेगवेगळया ठिकाणी घेतली जाते. वन खात्याच्या कामसंदर्भात नवीन संकल्पनावर चर्चा होऊन विचाराचे आदान प्रदान या मागचा उद्देश आहे. त्यातून वन विभागाचे कामकाज अधिक गतीमान व लोकभिमुख करण्यासाठी विचार मंथन होते. ही बैठक उद्याही दिवसभर चालणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड कार्याक्रमाचा आढावा, नियोजन, त्यासाठी निधीची उपलब्धता हा विषय प्रामुख्याने यात चर्चा झाली. वन्यप्राणी-मानव संघर्ष, वन वणवा, वन संरक्षण, जैवविविधता , वन-धन योजना , निसर्ग पर्यटन तसेच नाविन्यपुर्ण योजना इत्यादि विषयावर सखोल चर्चा होणार आहे. सर्व अधिकारी एकाच व्यासपीठावर असल्याने अनेक निर्णय तात्काळ होऊन, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने ही बैठक अत्यंत महत्वाची ठरते.
या बैठकीचे वेळी वनमंत्री यांचे हस्ते “शासन देईल भरपाई” या फोल्डरचे “महाराष्ट्रातील रान भाज्या”, “बॉयोडायव्हर्सिटी ऑफ दुर्गावाडी” या पुस्तकाचे आणि “फ्लोरा ऑफ मेळघाट” या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. या शिवाय “भिमाशंकर निसर्ग पर्यटन” या डीव्हीडीचे विमोचन केले. तसेच अस्त्र ॲप, “न्यायालयीन प्रकरणे मॅनेजमेंट” ॲप आणि संशोधन कामाचे माहिती अपलोड करण्यासाठीचे ॲप आणि वेब बेस्ट ॲपलिकेशन याचे विमोचन करण्यात आले. विभागाचे कामकाज जास्तीजास्त डिजीटल व्हावे व प्रत्यक्ष घटना घटत असतांना ती माहिती प्राप्त व्हावी ,अशी इच्छाही व्यक्त केली. त्याचा भाग म्हणून अस्त्र या ॲप मार्फत अवैध वृक्ष तोड, वन्यजीव-मानव संघर्ष, वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल यांची ई-डायरी या बाबी प्रत्यक्ष घटना घडत असतांना दिसणार आहे. (Real Time Monitoring) अस्त्र या ॲपव्दारे वन विभगागच्या मालमत्ता (Asset ) आणि घटना (Event) यांचे मापिंग करणे व त्यांचे संरक्षण करणे हा महत्वपूर्ण उद्देश साध्या होणार आहे. येत्या पावसाळयात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्द‍िष्ट यशस्वी करण्याचे आवाहन केले. लोकांच्या मनामध्ये वृक्ष लागवडीची संकल्पना रुजविण्यासाठी व हा कार्यक्रम लोकचळवळीत रुपांतर करण्याचे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.

blank