पाणी टंचाईमुळे महिलांनी शिवसेना आमदारच भाषण थांबवले

0
10

जालना,दि.16 – जालना लोकसभा मतदारसंघात पैठण तालुक्यातील अनके गावात सोमवारी भाजपचे उमदेवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ गाव भेटी घेऊन बैठक घेण्यात आल्या.निवडणुकीच्या प्रचाराला आलेल्या शिवसेना आमदाराला महिलांनी घेराव घालत गावातील पाणी टंचाई बद्दल जाब विचारला. गावात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यावर आधी बोला असे म्हणत महिलांनी आमदाराचे भाषण बंद पाडले. महिलांची आक्रमकता पाहून आमदार आणि प्रचाराला गेलेल्या कार्यकर्त्यांनी आपले भाषण आवरते घेऊन काढता पाय घेतला.

लिंबेगाव येथे शिवसेना आमदार संदीपान भुमरे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष सुनील शिंदे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार यांचे भाषण सुरू असतानाच गावातील महिलांनी हातात हंडे घेत बैठकीत दाखल झाल्या. आमच्या गावात पाणी टंचाई आहे,जनावरांना चार नाही. आधी आमच्या समस्या सोडवा नंतर तुमचे भाषण ठोका अशा प्रकारे पवित्रा घेत भाषण बंद पाडले.महिलांनी घेतलेल्या भुमिकेमुळे आमदार भुमरे आणि शिवसेना-भाजप नेते यांनी महिलांना बैठक झाल्यावर आपण चर्चा करू असे आवाहन केले. मात्र गावकरी महिला यांचा रोष वाढत असल्याचे लक्षात घेत आमदार भुमरे यांनी आपले भाषण आवरते घेत, गावात अजून एक टॅंकरची व्यवस्था करतो असे सांगत गावातून काढतापाय घेतला.जालना लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातील ११ गावांनी मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरकार बद्दल प्रचंड रोष पाहायला मिळत असून हा रोष मतपेटीत पाहायला मिळाला तर भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या अडचणी वाढू शकतात.