राज्यभरातील 9 हजार ग्रामपंचायतींसाठी 25 जुलै व 4 ऑगस्टला मतदान- जे.एस. सहारिया

0
7

मुंबई दि. २३-: ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 1 हजार 779 सार्वत्रिक व 632 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 25 जुलै 2015 रोजी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 23 जिल्ह्यातील 7 हजार 19 सार्वत्रिक व 1 हजार 212 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागांत मंगळवारी रात्री 12 पासून आचारसंहिता लागू होईल. निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी राहील; परंतु संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या पाच तालुक्यांत मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करतील. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी 27 जुलै रोजी; तर दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी 6 ऑगस्ट रोजी होईल. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक; तसेच इतर ठिकाणच्या जिल्हा परिषदेचे निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणात पोटनिवडणूक झाली असल्यास अशा ठिकाणी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटावर मार्कर पेनाने खूण करावी.
पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम:
• निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक- 25 जून 2015
• नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 4 ते 10 जुलै 2015
• नामनिर्देशनपत्रांची छाननी- 13 जुलै 2015
• नामनिर्देशनपत्रे मागे घेणे व चिन्ह वाटप- 15 जुलै 2015
• मतदान- 25 जुलै 2015
• मतमोजणी- 27 जुलै 2015
पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या (कंसात रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या): सांगली- 97 (9), कोल्हापूर- 416 (57), बीड- 92 (28), नांदेड- 281 (2), लातूर- 8 (66), अमरावती- 18 (93), यवतमाळ- 502 (124), वर्धा- 31 (42), भंडारा- 148 (14), गोंदिया- 182 (7) आणि गडचिरोली- 4 (190). एकूण-1779 (632).

दुसऱ्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम:
• निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक- 4 जुलै 2015
• नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 13 ते 20 जुलै 2015
• नामनिर्देशनपत्रांची छाननी- 21 जुलै 2015
• नामनिर्देशनपत्रे मागे घेणे व चिन्ह वाटप- 23 जुलै 2015
• मतदान- 4 ऑगस्ट 2015
• मतमोजणी- 6 ऑगस्ट 2015
दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या (कंसात रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे- 1 (91), पालघर- 2 (0), रायगड- 24 (91), सिंधुदूर्ग- 0 (62), रत्नागिरी- 1 (188), नाशिक- 11 (202), धुळे- 220 (0), अहमदनगर- 749 (92), नंदूरबार- 26 (29), जळगाव- 776 (32), पुणे- 704 (196), सोलापूर- 128 (18), सातारा- 711 (15), औरंगाबाद- 588 (39), परभणी- 524 (4), उस्मानाबाद- 422 (12), जालना- 0 (24), हिंगोली- 467 (0), अकोला- 220 (49), वाशीम- 163 (0), बुलढाणा- 521 (25), नागपूर- 129 (0) आणि चंद्रपूर- 632 (43). एकूण- 7019 (1212).