लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र व्हावी : राष्ट्रपती

0
11

नवी दिल्ली,दि.6 : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात अशी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सततच्या निवडणुकांमुळे देशाच्या विकासाच्या कामांवर परिणाम होतो, असंही राष्ट्रपती म्हणाले.
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवानत एका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रणव मुखर्जींनी शिकवलं. यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकांमधील खर्चावर प्रश्न केला. त्याला उत्तर देताना प्रणव मुखर्जींनी लोकसभेबरोबर विधानसभांची निवडणूक व्हावी असं मत व्यक्त केेले.
“देशभरात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणूक सुरु असते. त्यामुळे प्रशासनातील मोठी कुमक या निवडणुकांसाठी काम करत असते. विविध निवडणुकांमुळे लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे सरकारला नवे निर्णय घेता येत नाही आणि सर्व कामकाजही ठप्प होतं,” असं राष्ट्रपतींनी सांगितले.
या प्रक्रियेतून तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांनी मिळून यासंदर्भात योग्य निर्णय घ्यायला हवा असंही मुखर्जी यांनी सांगितले.
देशाच्या विकासासाठी कमी निवडणुका असण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं होतं. मोदी आणि भाजपकडून सातत्याने हा प्रस्ताव ठेवला जातो.मागील वर्षी न्याय आणि कायदा मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा सल्ला दिला होता.काँग्रेसचे शशी थरुर यांनीही यास समर्थन दिले आहे,परंतु डाव्या पक्षांचा मात्र विरोध दिसून येत आहे.