दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ – संजय राऊत

0
8

मुंबई, दि. 11 – अमरनाथमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकावर हल्ला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत. काश्मीरमधील दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ असल्याचं सांगत संजय राऊत यांनी चर्चा न करता हल्ल्याचा बदला घेण्याची भूमिका घ्यावी असंही सांगितलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं असून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.संजय राऊत बोलले आहेत की, ‘हल्ल्याचा फक्त ट्विटरवर निषेध करुन चालणार नाही. अमरनाथ हल्ला हा दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकावर हल्ला आहे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घेण्याची आमची भूमिका आहे’. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंनी 1996 मध्ये घेतलेल्या भुमिकेची आठवण करुन दिली. ‘1996 रोजी जेव्हा दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती तेव्हा बाळासाहेबांन कठोर भूमिका घेतली होती. हजसाठी मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली होती’, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘नोटाबंदीचा परिणाम काश्मीरमधील दहशतवाद्यांवर झाल्याचा दावा सरकारने केला होता, मात्र तसं झालेलं दिसत नाही. सर्जिकल स्ट्राईक असो वा नोटाबंदी यामुळे दहशतवाद्यांवर कोणताच परिणाम झालेला नाही’, अशी टीका संजय राऊत यांनी केली.