महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार

0
12

नवी दिल्ली दि.15 : महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये मुंबई येथील मास्टर जैसेल शाह, आरंभ इंडिया या संस्थेला आणि पुणे जिल्हयातील शांतीलाल गुलाबचंद मुथा यांना बालकांकरिता केलेल्या उत्तम सेवेसाठी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्यावतीने बाल दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीत राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ.वीरेंन्द्र कुमार यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते 2017 चे राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. या राष्ट्रीय बाल पुरस्कारात विशेष उल्लेखनीय प्रावीण्य, सेवाभावी संस्था आणि व्यक्तीच्या कार्याचा गौरव अश्या तीन विभिन्न गटातून पुरस्कारांची निवड करण्यात आली.राष्ट्रीय बाल पुरस्कारात विशेष उल्लेखनीय प्रावीण्य गटात मुंबई येथील मास्टर जैसेल शाह यास बुध्दीबळ खेळातील नैपुण्याकरीता दहा हजार रुपये रोख,रजत पदक, प्रमाणपत्र, याशिवाय 10,000 रुपयांचे पुस्तक व्हाऊचर देण्यात आले.
आरंभ इंडिया  या  मुंबईतील बाल लैगिंक शोषण विरोधी कार्य करणा-या संस्थेस गौरविण्यात आले.  ३ लाख  रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ही संस्था लौंगिक शोषण झालेल्या बालकांचे पुर्नवसनाचे काम पाहते, यास‍ह लौंगिक शोषणाबाबत प्रचार-प्रसाराचे काम करते. ही संस्था युनीसेफशी जोडलेली आहे.
दिव्यांग बालकांच्या क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना राजीव गांधी मानव सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील शांतीलाल गुलाबचंद मुथा यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार व्यक्तीगत सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून दिला जातो. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख, रजत पदक, प्रमाणपत्र असे आहे.