गुजरातमध्येच ‘डिजिटल इंडिया’ फोल, अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कच नाही!

0
7

अहमदाबाद,दि.28 : एकीकडे देशात 4G, कॅशलेस इकॉनॉमी, ई-पेमेंट, ई-गव्हर्नन्स इत्यादी गोष्टींची जोरदार चर्चा आहे. यासंबंधी सरकारही वेगवेगळ्या योजना, अभियान राबवत आहे. तर दुसरीकडे देशातल्या अनेक गावांमध्ये अजूनही मोबाईल नेटवर्क नाही. विशेष म्हणजे ‘डिजिटल इंडिया’साठी आग्रही असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 50 गावांमध्ये अद्याप मोबाईल नेटवर्क मिळत नाही. दिव्याखाली अंधार म्हणतात, तसे काहीसे गुजरातमध्ये दिसून येत असल्याचे वृ्त्त एबीपी या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.गुजरात विधानसभेची लढाई जेवढी ग्राऊंडला लढली जाते आहे, तेवढीच मोबाईल आणि सोशल मीडियावरही लढली जाते आहे. मात्र गुजरातमधील असे काही क्षेत्र आहेत, जिथे साधं मोबाईल नेटवर्क नाही. इंटरनेटची तर बातच नाही.

धक्कादायक म्हणजे मोबाईल नेटवर्क नसलेले अनेक परिसर असे आहेत, जे जिल्हा मुख्यालयांना जोडलेली आहेत. म्हणजे जिल्हा मुख्यालयापासून 15 किलोमीटरचा अंतर पार केला की मोबाईल नेटवर्क गायब होते.गुजरातमधील निर्मदा जिल्ह्याचं मुख्यालय राजपपिला येथे आहे. या राजपपिलापासून 25 किलोमीटरवर महामार्गानजीक अनेक आदिवासीबहुल गावे आहेत. इथे आदिवासी समाजाची संख्या मोठी असली, तरी शहरी संस्कृतीने त्यांना मोहात पाडलं आहे. मुख्य प्रवाहात ते येऊ पाहत आहेत. मात्र मोबाईल नेटवर्कसारख्या आधुनिक सुविधांनी त्यांच्या या मार्गात काहीसा अडथळा निर्माण केला आहे.आपण 3G, 4G नेटवर्क नसेल, तर आरडाओरडा करतो किंवा 5G च्या येण्याकडे डोळे लावून बसलो आहोत आणि तिकडे नर्मदा जिल्ह्यातील गावांसारखे अनेक गावं आहेत, जिथे साधं मोबाईल नेटवर्क नाही.

गुजरातमध्येच अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी सध्या देशाचे पंतप्रधान आहेत. डिजिटल इंडिया बनवणं, हे त्यांचं महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे. मात्र त्यांच्याच राज्यातील अनेक गावं अजून मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहेत.एबीपी न्यूजच्या टीमने गागर गावात जाऊन याबाबत माहिती घेतली. गावातील छपरावर डीटीएचचे एन्टिना दिसून आल्या. म्हणजेच, लोकांकडे खरेदी करण्याची क्षमता आहे आणि डीटीएच सिग्नलही पोहोचत आहे. मात्र मोबाईल नेटवर्कच्या नावाने बोंब आहे.याच गागर गावातील काही जणांकडे मोबाईलही आहे. मात्र मोबाईलसाठी लागणारं नेटवर्क मात्र इथे नाही. त्यामुळे इतर जगापासून इथली जनता काही प्रमाणात तुटल्याची दिसून येते.

कोणत्याही प्रकराची आणीबाणीची स्थिती निर्माण झाली, तर शहराकडे धाव घ्यावी लागते किंवा उंच डोंगरावर जाऊन मोबाईल नेटवर्क मिळतो का, हे पाहावं लागतं. एकीकडे ई-पेमेंटच्या प्रचार-प्रसाराच्या गोष्टी केल्या जात असताना, गुजरातमधील अनेक गावात मोबाईलवरुन अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही बोलावू शकत नाही.