जांभुळखेडा नक्षल भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे

0
16

गडचिरोली,दि.७: महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लेंडारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रेणेने आपल्या हाती घेतला असून, एनआयएची चमू गडचिरोलीत दाखल झाली आहे.

३० एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने व अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी जांभूळखेडा-लेंडारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला. यात १५ पोलिस व एका खासगी वाहनचालक शहीद झाले होते. या प्रकरणी अलिकडेच विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी कुरखेड्याचे तत्कालिन उपविभागीय पोलिस अधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करण्याची घोषणा केली. दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने या भूसुरुंगस्फोटाचा तपास आपल्या हाती घेतला असून, यंत्रणेची चमू गडचिरोलीत दाखल झाली आहे. भूसुरुंगस्फोटासंबंधीचे महत्वाचे दस्तऐवज व माहिती ही चमू गोळी करीत असून, नुकतीच या चमूने घटनास्थळालाही भेट दिली आहे. जिल्हा पोलिसांकडे सध्या या घटनेचा तपास असून, दोन-तीन दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासासंबंधी सर्व दस्त्‍ऐवज सुपूर्द करणार आहेत. देशातील काही महत्वाच्या नक्षल घटनांचा तपास करण्याचे एनआयएने ठरविले आहे. छत्तीसगड व झारखंडमधील घटनांचाही तपास ही यंत्रणा करणार असून, आता गडचिरोलीतील जांभूळखेडा स्पोटाच्या तपासात एनआयएने लक्ष घातले आहे. आतापर्यंत भूसुरुंगस्फोटाप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.