नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या भूसंपादन अध्यादेशास शेतकऱ्यांच्या संघटनेतर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेल्या आव्हानांसदर्भातील याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एच एल दत्तु आणि न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या संघटनेतर्फे बाजु लढवित असलेल्या ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंह यांनी या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी केली जावी, अशी विनंती न्यायालयास केली होती.
भूसंपादन अध्यादेश हा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत संघटनेतर्फे त्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या संघटनेमध्ये भारतीय किसान युनियन, ग्राम सेवा समिती, दिल्ली ग्रामीण समाज आणि चोग्मा विकास आवाम अशा विविध संस्थांचा समावेश आहे. या अध्यादेशानुसार कारवाई करण्यापासून सरकारला रोखण्यात यावे, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.