अकोला,दि.17ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विधानानंतर भाजपा, शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ रोखावी अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुळ शेवाळे यांनी केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकात्मक विधान केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत काही कादगपत्रे दाखवली आहेत. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक पत्र दाखवलं आहे. हे पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्र दाखवत “सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत आहे. ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असे सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत. फडणवीस यांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
LIVE: Media Interaction | Bharat Jodo Yatra | Maharashtra https://t.co/8M4Y1LDwzH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2022
“गांधी, नेहरू, पटेल हे कित्येक वर्षे तुरुंगात होते. मात्र त्यांनी कोणत्याही पत्रावर सही केली नाही. मात्र सावरकर यांनी या पत्रावर भीतीमुळे सही केली होती. ते घाबरत नसते तर त्यांनी या पत्रावर कधीच सही केली नसती. त्यांनी पत्रावर जेव्हा सही केली, तेव्हच त्यांनी पटेल, नेहरू आणि गांधी यांना धोका दिला,” असेही राहुल गांधी म्हणाले.दरम्यान, राहुल गांधी या सावरकरांवर पुन्हा एकदा टीकात्मक भाष्य केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या विधानानंतर सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर आक्रमक झाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील, असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत असून बदनामी करत आहेत, असेही रणजीत सावरकर म्हणाले.