सायबर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुन्ह्यांमध्ये साडेतीन हजारावर आरोपींना अटक

0
8

मुंबई, दि. 25 : नवीन तंत्रज्ञानाचा फायदा गुन्हेगार सुद्धा घेतात. त्यावर मात करण्यासाठी गृह विभागात नवीन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा तसेच माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत सन 2014 ते मे 2017 पर्यंत दाखल झालेल्या 8,108 प्रकरणांपैकी 3,736 प्रकरणी गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भात सदस्य बाळासाहेब थोरात यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
डॉ. पाटील म्हणाले, सायबर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुन्हे हे मोठे आव्हान आहे. या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत असून सायबर लॅबमध्ये अत्याधुनिक तपास यंत्रे,साधनसामग्री तसेच इतर उपकरणे यांची खरेदी व पुरवठा प्रक्रिया सुरू आहे.अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता शासनामार्फत पुढील पाच वर्षांसाठी
837 कोटी रूपये खर्चाचा प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यातआली आहे.
या प्रश्नासंदर्भातील प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथराव खडसे, डी. पी. सावंत यांनी भाग घेतला.