भुजबळ हेच भ्रष्टाचारी का,उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्री सज्जन आहेत का ?

0
12

सांगली, दि. 28 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक वेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतक-यांची फसवणूक करीत आहेत. कर्जमाफीच द्यायची आहे, तर अर्जाच्या नावाखाली वेळकाढूपणा कशासाठी करता ?, असा सवाल शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच दीड लाख नव्हे, संपूर्णच कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी आर या पारची लढाई लढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे, असा इशाराही त्यांनी दिला.सोबतच मुख्यमंत्री फडणवीस सज्जन असल्याचा आव आणत आहेत.प्रत्यक्षात भ्रष्टाचारी आमदार,मंत्र्यांवर ते काहीच कारवाई करीत नाहीत.महाराष्ट्रात एकटे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच भ्रष्टाचारी आहेत,उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्री सज्जन आहेत का? त्यांच्यावर कारवाईचा एकही शब्द फडणवीस का बोलत नाहीत,करीत नाहीत.म्हणजेच मुख्यमंत्री केवळ सज्जनपणाचा आव आणत असल्याची टीकाही रघुनाथदादांनी केली.
ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या शेतक-यांना कर्जातून मुक्त करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे. कर्जमाफी करून शेतक-यांवर उपकार करण्याची काहीच गरज नाही. कर्जमाफीचा एकदा निर्णय घेतल्यानंतर, दहा वेळा शासनाने आदेश बदलण्याची काहीच गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली जाते. पण त्यांच्यासारखे तात्त्विक धोरण राबविण्यात मुख्यमंत्री फडणवीस पूर्णत: अपयशी ठरले आहेत. कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असताना शेतक-यांकडून अर्ज भरून पुन्हा काय साध्य करणार आहेत? शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे एकमेव धोरण फडणवीस सरकारचे आहे.१५ ऑगस्ट रोजी एकाही मंत्र्याला ध्वजारोहण करू देणार नाही. राज्यभरातील शेतक-यांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक असल्यामुळे शेतकरी आणि त्यांची पोरे पेटून उठली आहेत. तेच मंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणार आहेत, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला. ध्वजारोहणास आमचा विरोध नसून मंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी, कर्मचारी अथवा शेतकºयांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असेही त्यांनी सांगितले.