यवतमाळ,दि.17(विशेष प्रतिनिधी)-भाजप सरकारच्या काळात माणसाच्या जिवाला किंमत राहिली नाही, असे चित्र आहे. काँग्रेसने दोन वर्षांपूर्वीच कर्जमाफीची मागणी केली. राज्यात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. फसवणूक करणाऱ्या फडणवीस सरकारला बाय-बाय करण्याची वेळ आली असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.18 आॅक्टोंबरला कर्जमाफीची रक्कम जमा करणार म्हणणारे सरकार 19 तारखेला दिवाळीच्या सुट्टीच्या दिवशी शेतकरी कुठून पैसा काढणार हे मात्र विसरल्याची टिका सुध्दा केली.
सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तिरंगा चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. बैलगाडीवर बसून मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. चव्हाण म्हणाले, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, शासनाला ठोस निर्णय घेता आला नाही. प्रत्येक पाच वर्षांनी औषध कंपन्यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. परंतु केंद्रीय खात्याने त्याकडे दुर्लक्ष करत कंपन्यांचे लाड पुरवले. शेतकरी, शेतमजुरांसह सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने सर्वच आघाड्यांवर निराशा केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य जनता भरडून निघत आहे. वेळोवेळी खोटी आश्वासने देण्यात आली. नोटाबंदी, जनतेवर लादलेली जीएसटी, थांबलेली रोजगारनिर्मिती, शेतकरी आत्महत्या, डिझेल-पेट्रोलच्या माध्यमातून जनतेची होणारी लूट, कीटकनाशकांच्या फवारणीत मृत्यू पावलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबीयांना दहा लाख तर, बाधितांना २ लाखांची मदत देण्याची मागणी करण्यात आली.