भान हरवलेले सरकार शेतकऱ्यांवर गोळ्याही झाडू शकते-अजित पवार

0
9
यवतमाळ,दि.2- बोगस आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता भोगणाऱ्या भाजप सरकारचे भान हरवले आहे. आता ते शेतकऱ्यांवरही गोळ्या झाडू शकते, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंडवरून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल’ आंदोलनाला शुक्रवारी सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनाचे नेतृत्व करत असून या वेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते यात सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी आत्महत्या आणि फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीची होती. भाजपाने तत्त्वत:, अटी, निकष आदी शब्द टाकून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविले आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मानसिकता भाजप सरकारची नाही. दोन समाजात तेढ निर्माण करायाचा आणि स्वत:ची पोळी भाजून घेणे एवढेच भाजपाला जमते. आपली जात शेतकरी आणि धर्मसुद्धा शेतकरीच असल्याचा उल्लेख पवार यांनी शेवटी बोलताना केला. त्यांच्या भाषणानंतर ‘हल्लाबोल’ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शहरातील पोस्टल ग्राउंडमधून निघालेल्या मोर्चात हजारो शेतकरी, वकिलांचा सहभाग होता. तद्नंतर मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून नागपूरच्या दिशेने निघाला. १ ते १२ डिसेंबरपर्यंत हा मोर्चा राहणार असून यवतमाळ ते नागपूर असे एकूण १५३ किलोमीटर अंतर पायदळी जाणार आहे. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे या मोर्चाला संबोधित करणार आहेत.