नवी दिल्ली, दि. १२ – दिल्लीत विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवासाठी भाजपाशासीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वाला जबाबदार ठरवले आहे. पक्षाने दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला निवडणुकीच्या मैदानात उतरवले नाही व त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला असे परखड मत व्यक्त करत रमण सिंह यांनी पक्षाला ‘घरचा आहेर’ दिला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला प्रोजेक्ट न करणे ही भाजपाची सर्वात मोठी चूक होती असे रमण सिंह यांचे म्हणणे आहे. दिल्लीत भाजपाने वीज, पाणी, कायदा व सुव्यवस्था अशा स्थानिक समस्यांमध्ये लक्ष घालून प्रचार कराया हवा होता असे त्यांनी नमूद केले. दिल्लीतील निकालाचे परिणाम राष्ट्रीय राजकारणावर पडतील का असा प्रश्न विचारले असता रमण सिंह म्हणाले, आप सध्या फक्त दिल्ली पुरताच मर्यादीत आहे. देशातील अन्य भागांमध्ये जनाधार वाढवण्यासाठी आपला आणखी मेहनत करावी लागेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनीही दिल्लीतील पराभवावर नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री प्रसारमाध्यमांसमोर बसून केजरीवाल झोपडीधारकांना कसे फसवत आहेत हे सांगत बसले. पण त्यांनी हे काम थेट झोपडपट्टी परिसरात जाऊन केले पाहिजे होते असे संघाच्या एका नेत्याने सांगितले. दिल्लीतील मतदारांसाठी आमच्याकडे घोषणापत्र नव्हते, दिल्लीकरांना आता काम करणारा पक्ष हवा होता, त्यांना राष्ट्रबांधणीमध्ये फारसा रस नव्हता असे मत दिल्लीतील संघाच्या एका कार्यकर्त्याने मांडले.