टोलमुक्तीच्या घोषणांमुळे हुरळून जाऊ नका – राज ठाकरे

0
12

मुबंई- राज्यातील सरकार फक्त टोलनाके बंद करण्याच्या घोषणा करते.पण, त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती जनतेला सरकारकडून दिली जात नाही, अशी टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ही फक्त घोषणा असून जनतेने हुरळून जाऊ नये असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. टोल आंदोलनांनंतर यापूर्वीच्या आघाडी सरकारनेही अनेक टोलनाके बंद केले आहेत. मग, आत्ताच्या सरकारने बंदी घातलेल्या या टोलनाक्यांमध्ये पूर्वीच्या टोलनाक्यांचाही समावेश आहे किंवा नाही, अशी नेमकी माहिती लोकांना कळली पाहिजे. त्यासाठी सरकारच्या टोल धोरणात पारदर्शकता हवी असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. त्यासाठी लोकांसमोर सत्य परिस्थिती आणण्याची गरज राज यांनी व्यक्त केली. याशिवाय, आगामी काळात टोलनाक्यांवरील रोख पैसे घेण्याची पद्धत बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.

टोलनाक्यांचा प्रश्न हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असूनही आपली न्यायालये मात्र, यासंदर्भातील निर्णय घेण्यात खूप वेळ लावतात, असे सांगत राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. टोलविषयी एखादा खटला दाखल केल्यास न्यायालय त्यासाठी तीन-तीन वर्षे तारीख देत नाही, याला काय म्हणायचे, असा सवालही त्यांनी केला. टोलचालक मनमानी पद्धतीने वागतात त्याविषयी न्यायालय काहीही बोलत नाही. मात्र, आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली तर आमच्यावर कारवाई करण्याचा दुजाभाव न्यायालयाकडून का करण्यात येतो, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.