भंडारा,गोंदिया,दि.14ः- भंडारा व गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांत बंडखोरी झाल्यामुळे तीन मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत तर 4 मतदारसंघात बंडखोरीनंतरही सरळ लढतीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.साकोलीमध्ये सेवक वाघाये हे तिरंगी लढतीच्या बाहेर पडले असून पटोले व फुके यांच्यातच सरळ लढत होत आहे.त्याचप्रमाणे अर्जुनी मोरमध्ये बडोले व चंद्रिकापुरेत,तिरोड्यात रहागंडाले व बोपचेमध्येच सरळ लढत होत असून बनसोड यांना तिरंगीसाठी मेहनत करण्याची वेळ आली आहे.आमगावात रामरतन राऊत यांची हवा गोल झाल्याने ते स्पर्धेतूनच बाद झाल्याने पुराम व कोरेटीत लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली या तिन्ही जागा भाजपकडे होत्या; पण यावेळी पक्षाने तिघांचेही तिकीट कापून नवे उमेदवार दिले. तुमसरमध्ये चरण वाघमारे यांचे तिकीट शेवटच्या क्षणी कापून प्रदीप पडोळे यांना रिंगणात उतरविले. त्यामुळे नाराज वाघमारेंनी पडोळे यांच्याविरोधातच दंड थोपटल्याने याठिकाणी तिरंगी लढत निर्माण झाली आहे. भंडाºयात भाजपच्या विरोधात शिवसेनेतूनच बंडखोरी झाली. सेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी अरविंद भालापुरे (भाजप) यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.काँग्रेसचा उमेदवार हा याठिकाणी कमजोर पडत असून भंडारा येथेही भोडेंकरामुळे तिरंगी लढत होण्याची चित्र निर्माण झालेली आहेत. साकोलीत पालकमंत्री परिणय फुके (भाजप) आणि नाना पटोले (काँग्रेस) आमनेसामने असल्यामुळे ही लढत हेवीवेट मानली जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. येथे भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले. गोंदियात भाजपचे गोपालदास अग्रवाल यांना विनोद अग्रवालांचे मोठे आव्हान आहे.त्यासोबतच काँग्रेसचे उमेदवार अमर वराडे यांच्याही प्रचाराने वेग घेतल्याने याठिकाणी तिरंगी लढत होण्याची चिन्ह तयार झाली आहेत.वराडे किती समोर जातात त्यावरच भाजपच्या अग्रवालांचा निर्णय राहणार आहे. आमगावात काँग्रेसचे सहसराम कोरोटे यांना बंडखोर रामरतन राऊत डोकेदुखी ठरतील अशी चित्र होती,परंतु राऊत खुप मागे पडल्याने ते तिरंगी लढतीच्या बाहेर गेले आहेत.त्यामुळे कोरेटे व पुराम यांच्यातच हा सामना रंगणार असून आमगाव तालुका निर्णायक राहणार आहे. तिरोड्यात राष्टÑवादीचे गुड्डू बोपचे यांना उमेदवारी मिळाल्याने दिलीप बन्सोड यांनी बंडखोरी केली.परंतु बनसोड हे नेहमीच बंडखोरी करीत असल्याने पक्षाचे नुकसान होत असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्याने त्यांच्यासोबत आता राष्ट्रवादीचे लोक फार कमी राहिलेत.त्यामुळे त्यांना मागच्यासारखी स्थिती राहिली नसून तिरंगी लढत निर्माण करण्याची त्यांची तयारी असली तरी ते होणार नसल्याचे चित्र मतदारसंघात दिसून आहे.त्यातच जुने कार्यकर्ते सुध्दा त्यांची साथ सोडू लागले आहेत.तर भाजप उमेदवार रहागंडाले यांना गुड्डू बोपचेमुळे अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.याठिकाणी सध्याच्या परिस्थीतीत दुहेरी लढतीचेच चित्र दिसून येत आहे.




