मोरबी दुर्घटना- दुखवट्यात स्वागत:मोदींच्या दौऱ्याआधी रुग्णालयाची डागडुजी, नवे बेड-वॉटर कूलर लावले; येथेच काल होते 100 मृतदेह

0
33

30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या मोरबी येथील पूल दुर्घटनेतील आतापर्यंत केवळ 134 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा मृत्यूचा अधिकृत आकडा आहे. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांनी पुन्हा एकदा मच्छू नदीतील मृतदेहांचा शोध सुरू केला आहे.

गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबीमध्ये मृतांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट घेणार आहेत. मोरबी दौऱ्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलला रंगरंगोटी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. रुग्णांच्या वॉर्डात नवीन बेड आणि वॉटर कुलरही बसवण्यात आले आहेत. काल याच रुग्णालयात 100 मृतदेह आणण्यात आले होते.

विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने रुग्णालयाच्या रंगरंगोटीवर तोंडसुख घेतले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांचे फोटोशूट व्हावे म्हणून भाजप इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये गुंतले आहे.

मोरबी दुर्घटनेचे मोठे अपडेट्स…

  • पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यावर 14 नोव्हेंबरला कोर्टात सुनावणी होणार आहे.
  • एनडीआरएफने सांगितले – आम्हाला वाटते की काही मृतदेह नदीच्या तळाशी असावेत. आम्ही पाणबुड्यांना बोलावून शोध मोहीम पुन्हा सुरू केली आहे.
  • पुलाची देखभाल करणाऱ्या ओरेवा कंपनीचे दोन व्यवस्थापक, पुलाची दुरुस्ती करणारे दोन कंत्राटदार, दोन तिकीट क्लार्क आणि तीन सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली आहे.
  • या दुर्घटनेनंतर अहमदाबादमधील अटल पुलावरही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 1 तासात फक्त 3,000 लोक इथे जाऊ शकतील. अहमदाबाद महापालिकेने हा अलर्ट जारी केला आहे.

मोरबी दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी पहाटेची दोन छायाचित्रे…

हे दृश्य मंगळवारी सकाळचे आहे. यामध्ये मोरबीचा तुटलेला झुलता पूल आणि दुर्घटनेच्या खुणा दिसत आहेत.
हे दृश्य मंगळवारी सकाळचे आहे. यामध्ये मोरबीचा तुटलेला झुलता पूल आणि दुर्घटनेच्या खुणा दिसत आहेत.
दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोपिया, मादेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल, मुकेश चौहान यांना अटक करण्यात आली. हे फोटो आता समोर आले आहेत.

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली. पंतप्रधान म्हणाले की, पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यात यावी. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये राजकीय शोक पाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या दिवशी राज्यातील सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. या बैठकीत मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि मुख्य सचिव, डीजीपी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आज दुपारी मोरबीला भेट देणार आहेत.

जम्मू येथील शिक्षा निकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोरबी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
जम्मू येथील शिक्षा निकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोरबी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

पूल दुर्घटनेच्या तपासात 50 जणांची टीम

राजकोट रेंजचे आयजी अशोक कुमार यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले की, 50 जणांचे पथक पूल दुर्घटनेच्या तपासात गुंतले आहे. याला जबाबदार असलेल्या बड्या लोकांना कधी अटक करणार, असा सवाल पत्रकारांनी केला. या प्रश्नावर आयजी म्हणाले – आतापर्यंत ज्यांची भूमिका समोर आली आहे त्यांना अटक करण्यात आली आहे. नावे समोर आल्यावर आणखी अटक होणार आहे.

आतापर्यंत 134 जणांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी सकाळी 134 वर पोहोचली आहे. यापैकी 45 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मृतांमध्ये महिला आणि वृद्धांचा समावेश अधिक आहे. 170 जणांना वाचवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी 6.30 वाजता 765 फूट लांब आणि अवघ्या 4.5 फूट रुंद झुलता केबल पूल कोसळून ही दुर्घटना घडली. 143 वर्षे जुना हा पूल ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आला होता.

गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल बंद होता. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुर्घटनेच्या 5 दिवस आधी 25 ऑक्टोबरला हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी येथील गर्दी क्षमतेपेक्षा जास्त होती. हेदेखील अपघाताचे कारण असल्याचे बोलले जात आहे. या अपघाताचा 30 सेकंदांचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये 15 सेकंदांनंतर पूल तुटल्याने लोक मच्छू नदीत वाहून गेले.

वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीदरम्यान मोरबी दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना भाविकांनी श्रद्धांजली वाहिली.
वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीदरम्यान मोरबी दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना भाविकांनी श्रद्धांजली वाहिली.
सोमवारी सकाळी समोर आलेले हे चित्र मोरबी जिल्हा रुग्णालयातील आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथे ठेवण्यात आले. रुग्णालयाचा संपूर्ण कॉरिडॉर मृतदेहांनी भरला होता.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला

केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान मोदी बोलत होते. यादरम्यान ते भावुक झाले. म्हणाले- ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी शोक व्यक्त करतो. एनडीआरएफ, आर्मी आणि एअर फोर्सचे पथक बचाव कार्यात गुंतले आहेत. लोकांच्या समस्या कमी व्हाव्यात, हाच प्रयत्न आहे. पीएम मोदी सोमवारी दुपारी बनासकांठा येथे पोहोचले, जिथे त्यांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. यादरम्यान पूल दुर्घटनेवर बोलताना ते भावुक झाले.

अधिकारी म्हणाले- 100 ची क्षमता होती, 500 लोक जमले होते… अपघाताचे हेच कारण

या ग्राफिक्सच्या माध्यमातून पुलाचे स्थान आणि तो कसा तुटला हे समजून घ्या.

या पुलाचे बांधकाम झाल्यापासून अनेकवेळा नूतनीकरण करण्यात आले आहे. नुकतेच दिवाळीपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. मोरबीचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांनी दिव्य मराठीला सांगितले की, पूल कोसळल्यानंतर लोक जिथे पडले तिथे 15 फूट पाणी होते. काही लोक पोहत बाहेर आले, पण बरेच लोक केबल-जाळीला अडकून राहिले. हा पूल महापालिकेच्या अखत्यारीत येतो, असे रस्ते व इमारत विभागाचे मंत्री जगदीश पांचाळ यांनी दिव्य मराठीला सांगितले. पुलाची क्षमता 100 लोकांची असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र रविवार सुटीचा दिवस असल्याने अपघाताच्या वेळी पुलावर 400 ते 500 लोक जमा झाले होते. यामुळे पूल मधूनच तुटला.

4 मुद्द्यांत समजून घ्या मोरबी दुर्घटना, कारवाई आणि बचाव…

1. जबाबदारी कोणाची, कारवाई काय झाली

पुलाच्या देखभालीची जबाबदारी ओरेवा ग्रुपकडे आहे. या ग्रुपने मार्च 2022 ते मार्च 2037 पर्यंत 15 वर्षांसाठी मोरबी नगरपालिकेसोबत करार केला आहे. हा ग्रुप पुलाची सुरक्षा, स्वच्छता, देखभाल, टोल वसुली, कर्मचारी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतो. एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती अपघाताची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करेल. याप्रकरणी जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये ओरेवा कंपनी किंवा तिच्या मालकाचे नाव नाही.

येथे तिकिटांसाठी जास्त पैसे घेतले जात होते. नफ्याच्या लालसेपोटी तिकीट विक्रेत्यांनी क्षमतेपेक्षा जास्त लोकांना तिकिटे दिली. पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे.

2. बचाव

एसडीआरएफ, एनडीआरएफ, आर्मी आणि एअर फोर्सचे पथक रात्रीच पोहोचले होते. याशिवाय जामनगर म्हणजे 100 किमी हवाई दलाचे 50 गरुड कमांडोही दूरवरून आले. सोमवारी सकाळी एनडीआरएफ अधिकाऱ्याने सांगितले की, काही मृतदेह पुलाखाली अडकले असावेत. गढूळ पाण्यामुळे लोकांना शोधणे कठीण झाले. बचाव नौका, जलतरणपटू, पाणबुडे याशिवाय डझनभर पथके या कारवाईत गुंतलेली होती.

3. मदत

राज्य आणि केंद्र सरकारने अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. केंद्रातर्फे मृतांच्या आश्रितांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत दिली जाईल.

4. आरोप

निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हा पूल उघडल्यानंतर अवघ्या 5 दिवसांतच कसा कोसळला. याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.


 

143 वर्षांहून अधिक जुना आहे पूल

मोरबीचा हा झुलता पूल 143 वर्षे जुना असून त्याची लांबी 765 फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे साडेतीन लाख खर्चून तो पूर्ण झाला होता. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. तेव्हापासून या पुलाचे अनेकवेळा नूतनीकरण करण्यात आले. नुकतेच दिवाळीपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.

मोरबीचे राजा या पुलावरून दरबारात जायचे

मोरबीचे राजा प्रजावत्सल सर वाघजी ठाकोर यांच्या संस्थानकाळात हा पूल बांधण्यात आला होता. त्यावेळी राजवाड्यातून राजदरबारात जाण्यासाठी राजा या पुलाचा वापर करत असे. राजेशाही संपल्यानंतर या पुलाची जबाबदारी मोरबी नगरपालिकेकडे सोपवण्यात आली होती.