धुळे जिल्ह्यात विषबाधेतून दोन बालकांचा मृत्यू

0
14

धुळे – नवलनगर (ता. धुळे) येथे एकाच कुटुंबातील एका बालिकेसह दोन बालकांना पराठा खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना रविवारी सांयकाळी दोघांचाही मृत्यू झाला.

यश सुभाष बागूल (वय अडीच वर्षे), आर्या सुभाष बागूल (एक वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, नवलनगर येथेच अन्य एका घटनेत गावातील एकाच कुटुंबातील 16 जणांनी पिठले-भाकरी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवलनगरच्या आदिवासी वस्तीतील संजय भिल, कल्पना भिल यांच्यासह अन्य दोन बालकांना पराठा खाल्ल्याने विषबाधा झाली होती. त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना यश व आर्या या दोन्ही बहीण-भावंडाचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत रविवारी (ता. 25) गावातील एकाच कुटुंबातील 15 ते 16 जणांनी पिठले-भाकरी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यांना जुलाब, उलटीचा असा त्रास होऊ लागल्याने ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.