नक्षल्यांनी मोबाईल टॉवर जाळला, १२ डिसेंबरला भारतबंदचे आवाहन

0
13

गडचिरोली, दि.११: कल्लेड येथे चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर चवताळलेल्या नक्षल्यांनी पुन्हा विध्वसंक कारवाया करणे सुरु केले असून, काल रात्री एटापल्ली तालुक्यातील रोपी येथील बीएसएनएलचे मोबाईल टॉवर व अन्य सामग्री जाळून टाकली आहे.

नक्षल्यांनी नोव्हेंबर महिन्यात ५ सामान्य नागरिकांची हत्या केली, तसेच २ पोलिस जवानांनाही शहीद व्हावे लागले. त्यानंतर २ डिसेंबरपासून नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु झाला. या सप्ताहादरम्यान सी-६० पथकाच्या जवानांनी ६ डिसेंबर रोजी सिरोंचा तालुक्यातील कल्लेड येथील जंगलात ७ नक्षल्यांना यमसदनी पाठविले. या यशस्वी कारवाईचा पोलिसांनी मोठा जल्लोषही साजरा केला. मात्र, यामुळे संतापलेल्या नक्षल्यांनी काल एटापल्ली तालुक्यातील रोपी येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरला आग लावली. काल रात्री ५० ते ६० सशस्त्र नक्षलवादी रोपी येथे गेले. त्यानंतर त्यांनी गावातच असलेल्या टॉवरला आग लावली.

टॉवरसह डीटीएस, बॅटरी व अन्य महत्वाची सामग्रीही जळाल्याने ती निरुपयोगी झाली आहे. यामुळे बीएसएनएलचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच हे टॉवर उभारण्यात आले होते. नक्षल्यांनी शेजारीच एक बॅनर लावले असून, १२ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. ‘हिंदू धार्मिक उन्माद के खिलाफ कार्यवाही सप्ताह, न यहॉ राष्ट्रवाद चलेगा, न मनु का राज चलेगा, लोगों को जबरदस्ती हिंदू बनाना बंद करो, समाज का भगवाकरण बंद करो’ असा मजकूर बॅनरवर लिहिलेला आहे. या घटनेमुळे पुन्हा नक्षलवादी मोठ्या कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या १० वर्षांत नक्षल्यांनी नक्षल्यांनी बीएसएनएलचे टॉवर जाळले नव्हते. १४ नोव्हेंबर २००५ रोजी नक्षल्यांनी आरमोरी तालुक्यातील देलनवाडी(मानापूर) येथील दूरसंचार विभागाचा टॉवर भूसुरुंगस्फोटाद्वारे उडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर १० जानेवारी २००६ रोजी आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचिल येथील दूरसंचार कार्यालयातील यंत्रसामग्री व विजेची उपकरणे जाळली होती. पुढे १ डिसेंबर २००७ रोजी धानोरा मार्गावरील गिरोला येथील हच कंपनीचे टॉवर, शेड, पीयूसी, एसी जाळून स्फोटाद्वारे उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर काल रोपी येथील टॉवरला आग लावली.