मुंबई,दि.26 : – राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा 124 वर पोहोचला आहे.तर गेल्या ४८ तासांत पुण्यात एकही करोना रुग्ण आढळला नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
देशामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आले. तर महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 112 रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात एकूण कोरोनाबधितांची संख्या 600 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या 600 पर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 20 हजारांवर पोहोचली आहे.
राज्यभरात २२,११८ खोल्यांची सज्जता; ५५, ७०७ खाटांची सोय
– सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२,११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली आहे. येथे ५५,७०७ खाटांची सोय होऊ शकेल. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.विभागाने राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेकडो शासकीय इमारतींमधील २२,११८ खोल्या उपलब्ध करून दिल्या. यात विश्रामगृहे, वसतिगृहांचा समावेश आहे.
अमरावतीचे सर्व 68 तपासणी अहवाल निगेटिव्ह
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत असून, अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह तपासणीत आढळून आला नाही. कालपर्यंत पाठविण्यात आलेेल्या 68 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. पाच अहवाल प्रलंबित आहेत.
गडचिरोलीत पळसाच्या पानाचे बनवले मास्क
सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी सामान्य नागरिकही मास्क घालून फिरत आहेत. पण इथे त्याचाही तुटवडा आहे. मग दुर्गम भागातील आदिवासींकडे लक्ष देण्याची सुतराम शक्यता नाही. पण आपल्यापेक्षा आदिवासी कल्पक निघाले. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींनी पळसाच्या पानाचे मास्क तयार करून ते घातले. निसर्गाशी जवळीक त्यांनी इथेही सोडली नाही.




