नियोजनबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केले पुरस्कृत

0
39

पुरवठा विभागाचा उपक्रम “महिन्याचा मानकरी” पुरस्कार

 गोंदिया,दि.13 प्रशासनात अनेक अधिकारी-कर्मचारी वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण काम करीत असतात. त्यासाठी त्यांना कौतुकाची थाप सुद्धा मिळते आणि पुरस्कारही मिळतात. मात्र कार्यालयीन रचनेत शेवटी असणाऱ्यांना व्यक्तींचे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन कौतुक केल्याचा क्षण दुर्मिळ असतो. जिल्हा पुरवठा कार्यालयाने  कामाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी “महिन्याचा मानकरी” हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. वरवर पाहता ही बाब साधी वाटत असली तरी सहकाऱ्यांना ‘प्रोत्साहन’ व नवी उर्जा देणारी कृती आहे. या उपक्रमात जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. सकारात्मक व लोकाभिमुख काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुरस्कृत तर केलेच सोबत नवी प्रेरणा सुद्धा दिली.

प्रशासनात आपली कामगिरी सुधरावयाची असेल तर आपण संघ म्हणून यशस्वी होणे गरजेचे आहे. संघ तेव्हा यशस्वी होतो जेव्हा त्यास आपल्या टीम बद्दल ती आपली आहे ही भावना निर्माण होते. जिल्हा पुरवठा कार्यालय गोंदियाने हा प्रयत्न केला आहे. याला साथ लाभली ती अर्थातच जिल्हाधिकारी यांची.

या नियोजन ते अंमलबजावणी टप्प्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ‘महिन्याचे मानकरी’ हा पुरस्कार विभागाने सुरू केला आहे. या महिन्याच्या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी गोरेगाव येथील शासकीय धान्य गोदामात जाऊन केले. गोदाम परिसर, लावलेली वृक्ष, रेकॉर्ड कीपिंग, धान्य स्टॅकिंग या बाबत त्यांनी आढावा घेतला. स्वयंस्फूर्तीने शासकीय धान्य गोदामातील हमाल मंडळींनी गोदाम व्यवस्थापक मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांची जोपासना केली आहे. गोदाम परिसरास आपल्या दैनंदिन कामकाजासह एक “प्लेझंट वर्कप्लेस” चे स्वरूप दिले आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी सर्व हमाल मंडळीचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले.

या महिन्यात गोदाम व्यवस्थापक भूषण राऊत अर्जुनी यांनी 78 टक्के दुकानात धान्य पोहोचवून, तर पुरवठा निरीक्षक संवर्गात श्रीमती स्मिता आगाशे यांनी सर्वात प्रथम चलन, परमिट चे काम पूर्ण करून व अव्वल कारकून संवर्गात  किशोर ठवरे यांनी सप्लाय चैन व्यवस्थापनास गती दिल्याने त्यांना “महिन्याचे मानकरी” म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मानित केले.

            पुरवठा विभाग खूपदा पात्र रेशन कार्ड धारकापर्यंत धान्य पोहोचविण्याचे अविरत काम करीत असतो. दर महिन्याची 07 तारीख अन्न दिन म्हणून साजरी करायची असतें. ‘सप्लाय चैन’ चालवण्यासाठीचा प्रत्येक टप्पा महत्वपूर्ण असतो. जिल्हा कार्यालयातून शासनाकडून नियतन आदेश आल्यावर धान्याचे एफसीआयमध्ये निधी भरणे, तालुकानिहाय वितरण आदेश देणे, पहिल्या टप्प्यात धान्य उचलून तालुका गोदामात पोहोचवणे, तालुका गोदामातून द्वितीय टप्प्यात रास्त भाव दुकानदारा पर्यंत पोहोचवणे. यात मुख्यत्वे काम करणारे हमाल संघ उचल प्रतिनिधी, तांत्रिक कर्मचारी जिल्ह्यातील अव्वल कारकून, तालुक्यातील लिपिक, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक, निरीक्षण अधिकारी, तहसीलदार, लेखा अधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कडे असलेली कामे, फाइल्सचा विहित वेळेत निपटारा करणे गरजेचे असतें. तेव्हा कुठे कार्ड धारकांपर्यंत विहित वेळेत धान्य पोहोचते. हीच ती सप्लाय चैन. या कामात सहजता येण्यासाठी डेली मॉनिटरिंगची पद्धत तयार केली. याला सर्व अधिकार  कर्मचाऱ्यांनी साथ दिली व त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले. या बाबीचेही जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

जिल्हाधिकारी स्वतः येऊन कौतुक करतात ही बाब अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवणारी आहे. नियोजन ते अंमलबजावणी यासाठी प्रत्येक महिन्याला पुरवठा विभाग “महिन्याचा मानकरी” हा पुरस्कार आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देणार आहे. यामुळे त्यांच्या कामाचा हुरूप वाढेल व अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी लीना फाळके यांनी सांगितले.