एनएनटीआरमधील प्राणी गणनेचा मुहूर्त आता ३ जून वटपौर्णिमेला

0
11

गोंदिया: ५ मे बुद्ध पौर्णिमेला रद्द करण्यात आलेली प्राणी गणना आता वटपौर्णिमेला करण्याचा विचार सुरू आहे. तसा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सर्वत्र सातत्त्याने ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका लागून ५ मे बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना रद्द झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे यंदा बुद्ध पैणिर्मेला प्राणी गणना करता आली नाही. त्यामुळे वन्यप्रेमींचा हिरमोड झाला. जवळपास १५२ वन्यप्रेमीनी या गणनेसाठी आपल्या नावाची नोंद केली होती. दरम्यान, सदर गणना येत्या ३ जून रोजी वटपौर्णिमेला करण्याचा विचार सुरू आहे. तर तसा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला असल्याचे नवेगाव नागझिरा चे उपसंचालक पवन झेप यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांमध्ये निसर्ग, प्राणी यांच्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी बुद्ध पौणिर्मेला वन विभागाकडून ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात मचाणावरून हा अनुभव घेण्यासाठी वन्यप्रेमी उत्सुक असतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणाने त्यांच्या आनंदावर पाणी फेरले गेले असतानाच यंदाचा निसर्ग अनुभव हुकल्याचे दिसून आले.बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे नवेगाव नागझिरा, न्यू नागझिरा, परिसरात मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सतत पडणाऱ्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ही प्राणी गणना रद्द करण्यात आली. त्यामुळे वन्यप्रेमीना यंदाच्या प्राणी गणनेत सहभागी होता आले नाही किंवा निसर्गाचा अनुभव घेता आला नाही. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपर्ण राज्यासह जिल्ह्यातही अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पावसाचा जोर कायम पाहता पौर्णिमेच्या रात्री पाऊस, ढगाळ वातावरणाने चंद्र प्रकाश कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता प्राणी दर्शन शक्य होणार नाही.

तसेच पावसामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यात पाणी भरपूर असल्याने प्राणी कृत्रिम पाणवठ्यावर किंवा मचाण असलेल्या पावणठ्यावर पाणी पिण्यास येण्याची शक्यता कमी असल्याचे लक्षात घेऊन विभागाकडून यंदाची बुध्द पौर्णिमेला होणारी प्राणी गणना रद्द केली. विशेषत: या प्राणीगणने सहभागी होण्यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सुमारे १५२ वन्यप्रेमींनी आपल्या नावाची नोंदणी केली होती मात्र, अवकाळीचा फटका या वन्यजीव प्रेमींनाही सहन करावा लागला असून निसर्ग अनुभव घेण्यापासून मुकावे लागले आहे.