जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबध्द कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
45

गोंदिया,दि.29 : जलयुक्त शिवार अभियान ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. या अभियानांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामाला गती मिळावी यासाठी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पात्र गावांची निवड करुन नियोजनबध्द कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जलयुक्त शिवार अभियान 2.0, जलशक्ती अभियान (Catch the rain), गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार,  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0, प्रगणा कार्यक्रम अंमलबजावणीकरिता विविध स्तरावरील समित्या गठीत करणे आदी योजनांची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा मृद व जलसंधारण विभागाचे सदस्य सचिव सत्यजित राऊत, पाटबंधारे विभाग अभियंता महेश भेंडारकर,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

        जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत पात्र गावांची निवड करुन जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करावा. शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त कामांना कृषि, जलसंपदा, वन, मनरेगा यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांनी सुरुवात करावी. एकात्मिक पध्दतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधीत विभागाच्या समन्वयाने नियोजनबध्द अंमलबजावणी करावी.

जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी करुन शेतीसाठी संरक्षीत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात यावी. शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील  गावात जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.