अर्जुनी-मोर.-पिंपळगाव/खांबी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा दिनांक १९ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी, वाचनसंस्कृती ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक व सामाजिक जडणघडणीचा पाया असून अशा वाचनालयांच्या माध्यमातूनच सशक्त व सुजाण समाज घडतो, असे प्रतिपादन केले.
हे वाचनालय गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी अत्यंत सोयीस्कर ठरणार असून शांत व शिस्तबद्ध वातावरणात अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. स्पर्धा परीक्षा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक पुस्तके, संदर्भ साहित्य व विविध नियतकालिकांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्याला आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले, पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, सरपंच विलास फुंडे, उपसरपंच निरुताताई शेंडे, माजी सरपंच प्रज्ञाताई डोंगरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गौरीशंकर ब्राम्हणकर, मनोज कोरे, प्रतिभाताई ब्राम्हणकर, महेंद्र मेश्राम, अर्चनाताई तरोने, खुशबूताई गजबे, अनुरताताई वलथरे उपस्थित होते.
याशिवाय माजी उपसभापती राजेश कठाणे, ग्रामसेवक मेश्रामजी, पोलीस पाटील वशुधराताई चवरे, दिगंबर ब्राम्हणकर, दादाजी ब्राम्हणकर, देशपांडे सर तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.





