देसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत या डेपोसह तेथील खत निर्मिती प्रकल्पाची यंत्र सामुग्री व साहित्याची हाणी झाली. तब्बल दोन दिवस ही आग धुमसत असताना आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर वायुप्रदुषण झाले असताना ही आग नेमकी कशी भडकली याच्या खोलात जाण्यात न.प.प्रशासन तयार नाही. त्याऐवजी नगर परिषद प्रशासनाने सारवासारवीची भूमिका घेतल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीसाठी जबाबदार असणाऱ्यांना वाचविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचा खटाटोप सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन केंद्रात गुरूवारी (दि.13) दुपारी आग भडकली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप घेत संपूर्ण कचरा डेपोला कवेत घेतले. भडकलेल्या आगीच्या ज्वाळा खत निर्मिती प्रकल्पाच्या साहित्यापर्यंत पोहोचल्या. तातडीने नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाने अनेक वेळा पाण्याचा मारा करत ही आग शुक्रवारी आटोक्यात आणली. पण अशा पद्धतीने अचानक आग भडकण्यासाठी कोण जबाबदार आहे याची कारणमिमांसा करण्याचे आणि जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळून या गंभीर घटनेवर पांघरून घालण्याचा आटोकात प्रयत्न सुरू आहे.
राईस मिलमध्ये पेटविला होता कचरा?
नागरिकांच्या म्हणण्यांनुसार कचरा डेपोजवळच असलेल्या एका राईस मिलमध्ये कचरा पेटविण्यात आला होता. तो पेटलेला कचरा हवेत उडून कचरा डेपोमध्ये आला आणि त्यातून ही आग धुमसली अशी चर्चा सुरू आहे. कोणीतरी मुद्दाम ही आग भडकण्यासाठी तसे कृत्य केले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र त्याच्या खोलात जाण्याचे टाळण्यासाठी या प्रकरणाची साधी तक्रारही पोलिसात करण्यात आली नाही.





