प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे- न्या.आणेकर

0
11

गोंदिया,दि.१० : प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने जिल्हा न्यायालय गोंदिया येथे ९ नोव्हेंबरला राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
न्या.आणेकर पुढे म्हणाले, विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा व विधी सहाय्य यांची माहिती सर्व जनतेला व्हावी या उद्देशाने ९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमात उपस्थित एका व्यक्तीने ५ व्यक्तींना अशा कार्यक्रमांची, कायद्यांची व योजनांची माहिती सांगितल्यास या कार्यक्रमाचे उद्दिष्टय साध्य होईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीमती ईशरत शेख यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत देण्यात येणाऱ्या विधी सेवा, विविध योजनांचे कायदे या विषयावर, तसेच न्यायालयात योग्य प्रकरण दाखल करण्यासाठी तसेच न्यायालयात दाखल असलेल्या योग्य प्रकरणात मोफत वकील पुरविणे, गाव स्तरावर मोफत विधी सहाय्य केंद्र, पोलीस स्टेशनमध्ये बालकांचे मदतीसाठी नियुक्त पॅरा लीगल व्हालंटीयर्स, बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई योजना, कारागृहामध्ये बंदयांना मोफत विधी सहाय्य व सल्ला, कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन, लोकअदालतींचे आयोजन, मध्यस्थी योजनांची अंमलबजावणी याबाबत माहिती दिली.महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी त्यांचे विभागामार्फत दारिद्रय निर्मुलनासाठी व महिला सक्षमीकरणाकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. पी.एस.आगाशे यांनी, मानवी तस्करी व लैंगीक शोषणाला बळी पडलेल्यांना विधी सहाय योजना, असंघटीत काम करणाऱ्या कामगारांसाठी कायदा सेवा, बालकांसाठी बालक-स्नेहा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण योजना, मनोरुग्ण आणि मानसिक अपंग व्यक्तीकरीता योजना, गरिबी निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी योजना, आदिवासी हक्क संरक्षण व कार्यवाही योजना व अंमली पदार्थांमुळे पिडीत व्यक्तींना विधी सेवा आणि अंमली पदार्थांचे निर्मुलन योजना याविषयी माहिती दिली.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. टी.बी.कटरे यांनी, महिलांचे संरक्षण विषयक कायदे यांची उपस्थित महिला वर्ग व पक्षकारांना माहिती देवून ज्या महिलांवर, व्यक्तींवर, गटावर अत्याचार होत आहेत त्यांनी न्याय मिळविण्यासाठी व मोफत सहाय्य मिळण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात किंवा तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे यावेळी आवाहन केले.
विधी सेवांची जास्तीत जास्त जनतेपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी विविध कायदयांची, योजनांची माहिती असणारे भित्तीपत्रकांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. या प्रदर्शनीमार्फत जनतेनी विविध कायदयांची व योजनांची माहिती घेतली. या प्रदर्शनीमध्ये सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना विविध कायदयांचे, योजनांची माहिती असलेल्या माहितीपुस्तिका व माहितीपत्रके वितरीत करण्यात आली. सर्व न्यायीक अधिकारी, जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य, जिल्हा वकील संघाचे सदस्य, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत उत्कर्ष लोक संचालीत साधन केंद्राच्या महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन जिल्हा विधी सेवा समितीच्या सदस्या ॲड.शबाना अंसारी यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲड.सुनिता पिंचा यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महेंद्र पटले, शिवदास थोरात, कपिल पिल्लेवान, आर्यचंद्र गणवीर तसेच पॅरा लीगल व्हालंटीयर्स गुरुदयाल जैतवार, संतोष भांडारकर, जमरे, पंधरे, कटरे तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.