सिंचन विहीर योजनेचा लाभ घ्या- आ.विजय रहांगडाले

0
14

तिरोडा,दि.14: महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने धडक मोहिमेंतर्गत सिंचन विहीर योजना शेतकर्‍यांकरिता अस्तित्वात आणलेली आहे. शेतकर्‍यांनी सदर शासकीय योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्याचे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.बेरडीपार येथील नाटकाच्या उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, रमणीक सयाम, सरपंच सरिता राणे, उपसरपंच रमेश साठवणे, सदस्य मिलिंद कुंभरे, जितेंद्र रहांगडाले, पासपोर्ट एजंट राज सोनेवाने, कैलास कटरे, डिलेश पारधी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, या योजनेमुळे टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्याकरिता शेतकर्‍यांना मदत होईल. ही योजना गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी आहे. तसेच या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकर्‍यांना देण्याकरिता कोणत्याही अधिकारी अथवा कार्यालयाशी संपर्क न करता सरळ ऑनलाईन अर्ज शेतकरी करू शकतात. यासाठी शेतीचा सातबारा, नकाशा, नमुना आठ-अ, बँक पासबूक झेराक्स व अर्ज या कागदपत्रांची पूर्तता करुन कोणत्याही इंटरनेट कॅफेमधून महाऑनलाईन सेंटर येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्यासाठी वेबसाईटचा वापर करावा. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही अडचणी येत असल्यास आ. रहांगडाले जनसंपर्क कार्यालयात ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकर्‍यांकडे किमान 0.६0 हेक्टर जमीन असून कमाल र्मयादेकरिता कोणतीच अट नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी शासकीय योजनेचा त्वरित लाभ घेण्याचे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.संचालन पी.आर. कटरे यांनी केले. आभार पारधीकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.