शेतक-यांसाठी बच्चू कडूंचा मोर्चा, शेतक-यांवर पोलिसांचा लाठीमार

0
28

अमरावती, दि. ५ – प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेतक-यांच्या मागणीसाठी अमरावतीत कलेक्टर ऑफीसवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतक-यांच्या मालाचे भाव उतरले असून संत्री, कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या पिकाला चांगला भाव मिळावा यासाठी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी आक्रमक मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे १० हजार शेतकरी सामील झाले होते. मात्र कलेक्टर ऑफीसजवळ मोर्चेकरी पोचताच आधीपासून मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या पोलिसांनी मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या महिलांवर लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराची नळकांड्याही फोडल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या व सैरावैरा धावू लागल्या. ते पाहताच इतर मोर्चेक-यांनी पुढे धाव घेत पोलिसांना रोखण्याचा प्रय्तन केला. मात्र पोलिसांनी त्यांच्यावरही जोरदार लाठीमार केला. यामध्ये २७ जण जखमी झाले असून परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.