जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री

0
9

मुंबई, दि. 18 : विदर्भाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने शेती आणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी
व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. धोटे यांनी आमदार आणि खासदार म्हणून केलेले कार्य पथदर्शी आहे. त्यांनी नेहमीच वंचित आणि उपेक्षित घटकांच्या उन्नती आणि विकासाचा विचार केला. त्यांच्याकडे विशेष संघटन कौशल्य होते. राज्याचा विकास प्रादेशिक असमतोल ठेवून साधला जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक प्रदेशाला विकासाच्या मुख्य धारेत आणले पाहिजे हे त्यांचे केवळ मत नव्हते तर ते त्यांनी आपले राजकीय आणि सामाजिक दायित्व मानले होते. शेतकऱ्यांच्या प्रगतीबरोबरच विशेषतः विदर्भाच्या विकासाबाबत ते कमालीचे आग्रही होते. त्यांच्या निधनाने मार्गदर्शकाची भूमिका निभावणारे एक संघर्षयुग संपले आहे.