साकोली दि. 28 : कृषीपंपाचे भारनियमन बंद करुन २४ तास विद्युतपुरवठा सुरु राहावा तसेच धानाला तीन हजार पाचशे रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांना घेऊन साकोली येथे मागील पाच दिवसापासुन शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष असुन आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत आहे.दरम्यान, पाचव्या दिवशी आमदार बाळा काशीवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व उपोषण कर्त्याशी चर्चा करुन समस्या जाणुन घेतल्या व भारनियमनाबाबद उद्या २८ ला मुंबईला मुख्यमंत्री फडणवीस यांचेशी चर्चा करुन भारनियमन कमी करण्याचा प्रयत्न करु असे सांगितले यावेळी उपोषणकर्ते शाम महाजन, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. अजय तुमसरे, खोटेले व शेतकरी उपस्थित होते.
सततची नापिकी व वाढते कर्जाचे डोंगर यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. एकीकडे एकीकडे निसर्गाची अवकृपा, दुसरीकडे सिंचनाची अपुरी सोय यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची कशी असा पेच शेतकऱ्यांसमोर पडला आहे. पावसाळ्यात उत्पन्न अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही. त्यामुळे त्यांची भरपाई उन्हाळ्यात होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र फक्त ८ तासाच्या विज पुरवठ्यामुळे उन्हाळी धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे हे भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे. यासाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समिती साकोलीतर्फे पाच दिवसापासुन विज वितरण कपंनी कार्यालयासमोर महिला व पुरुष शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही. परिणामी काल दुपारी आंदोलनकांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तीन आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरीचे आंदोलन केले होते.





