१०९ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना-नगराध्यक्ष मेंढे

0
15

भंडारा ,दि.15: शहरातील पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. १०९ कोटी रूपयांच्या या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असून नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ची गरज पडणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.यावेळी उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, रजनीश मिश्रा यांच्यासह मुख्याधिकारी अनिल अढागळे उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, भंडारा शहरात सद्यस्थितीत जी पाणीपुरवठा योजना आहे, त्यानुसार दोन जलकुंभाच्या माध्यमातून ४४ लाख लिटर पाण्याचा प्रतिदिन पुरवठा केला जाऊ शकतो. परंतु, विविध समस्यांमुळे तितक्या क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. आता शासनाला सादर केलेल्या १०९ कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेनुसार अतिरिक्त चार टाकी शहरातील विद्यानगर, शास्त्रीनगर, खातरोड व एमएसईबी कॉलनीत बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. पाईपलाईन जुनी झाली असल्याने जास्त व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेला जलशुद्धीकरण बंद करून दसरा मैदानावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. या योजनेनुसार नागरिकांना प्रतिदिन किमान १३५ लिटर स्वच्छ पाणी पुरवण्यात येणार असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले. शहरात भुयारी गटार योजनेचा प्रकल्प तयार करण्यात आलेला असून त्यावर १२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.शहरातील मिस्कीन टँक व हुतात्मा स्मारक या दोन बालोद्यानांचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी चौक ते लायब्ररी चौकादरम्यान पायलट रस्ता पावसाळ्यापुर्वी तयार केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून चार हजार घरे बांधण्यात येतील, असेही मेंढे यांनी यावेळी सांगितले.