दारूबंदीसंदर्भात आणखी सक्त कायदे आणणार : मुनगंटीवार

0
13

चंद्रपूर,दि.18- जिल्ह्यातील दारूबंदी आणखी सक्त करण्यासाठी आगामी अधिवेशनात अधिक कडक कायदे तयार करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.’दारू सोडा, संसार जोडा’ या अभियानातंर्गत प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना तालुका राजुरा यांनी भव्य दारूव्यसनमुक्ती महामेळावा आयोजित केला होता. महिलांच्या प्रचंड उपस्थितीत पालकमंत्री मुनगंटीवारांनी हा निर्धार व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर व्यसनमुक्तीचा पुरस्कार करणारे शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी संतोष महाराज, महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अँड़ संजय धोटे, माजी आमदार एकनाथराव साळवे, प्रभाकरराव मामुलकर, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, सर्चग्रामच्या समाजसेविका आरती बंग, चंदू पाटील मारकवार, आबीद अली, मंगेश गुरुनुले, अनिल डोंगरे, लक्ष्मीकांत धानोरकर आदी उपस्थित होते.

दारूबंदी झालेल्या जिल्ह्यात सध्या काय सुरू आहे याची मला जाणीव आहे. पण हे चित्र बदलणार आहे. तुमचे असे आयोजन, सर्मथन एका बाजूने सुरू ठेवा. आगामी अधिवेशनात दारू बाळगणो, वाहतूक करणो, अवैध व्यवसाय या संदर्भात अधिक सक्षम कायदे बनविण्याचा संकल्प आहे. त्यामुळे आता एकदा सापडलेले वाहन पोलीस ठाण्याच्या बाहेरच पडणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित नागरिकांना या आयोजनाचा उत्साह व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग बघून आपण आनंदी झाल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद लढण्याचे बळ देते असे सांगून राजुर्‍यात मागणी केल्यावर व्यसनमुक्तीचे भव्य सभागृह बांधू, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे संचालन सतीश कौरासे यांनी केले.