गिधाडीत दोन घरे जळुन खाक

0
9

गोरेगाव ता ०3 मे (प्रतिनिधी) :- कामगार व महाराष्ट्र दिनी तालुक्यातील गिधाडी येथे सकाळी ९ च्या सुमारास ताराचंद रहांगडाले व सुलोचनाबाई रहांगडाले यांची  घरे आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली. परिणामी, घरातील सर्व साहित्य बेचिराख झाल्याने त्यांचेवर परावलंबी होण्याची पाळी आली आहे,

प्राप्तमाहितीनुसार, गिधाडी येथील ताराचंद रहांगडाले व सुलोचना रहांगडाले हे सकाळी शेतातील मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. घराला आग कशी लागली हे अद्यापही समजू शकले नाही.  आग विझविण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्याने आग आटोक्यात येऊन पुढील नुकसान टळले. अग्निशमन दलाची गाडी वेळेवर न पोचल्याने घरातील अन्नधान्य. कपडे दागिने भांडी आदी जिवनोपयोगी वस्तू राख झाल्याने दोन्ही कुटुंब उघड्यावर आली आहेत. सुदैवाने घरी कोणी नसल्याने जिवीत हानी टळली. पिडीतांना शासकीय निधी आणि घरकूल तत्काल देण्याची मागणी सभापती दिलीप चौधरी आणि जिल्हा परिषद सदस्य विश्वजीत डोंगरे यांनी केली आहे.