जबलपूर येथे घडलेला अपघात मानवनिर्मित

0
16

गोंदिया,दि.13 – जबलपूर येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात सडकअर्जुनी तालुक्‍यातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 लोक जखमी झाले होते. ही घटना मानवनिर्मित असून राज्यशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच मृत व जखमींच्या नातेवाइकांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जि. प. सदस्य परशुरामकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली आहे.

तालुक्‍यात एवढी मोठी घटना घडूनही तालुका प्रशासनाने मृताच्या व जखमींच्या कुटुंबीयांना भेटू नये, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरलेला आहे.परिसरातील आदिवासी दरवर्षी तेंदूपत्ता गोळा करण्याच्या माध्यमातून दोन पैसे मिळावेत म्हणून बाहेर राज्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात. यावर्षीही तालुक्‍यातील अनेक गावांतील लोक जबलपूर परिसरात गेले होते. ज्या तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे हे मजूर गेले त्या कंत्राटदाराला मध्य प्रदेश शासनाने वनविभागाचे वाहन उपलब्ध करून देणे हा नियमाचा भंग आहे. विशेष म्हणजे ते वाहन खासगी कंत्राटदाराचा चालक चालवत होता. मिळालेल्या माहितीवरून तो चालक नशेत असल्याने त्या वाहनाचा अपघात झाला. म्हणूनच हा अपघात मानवनिर्मित आहे. त्यात 11 लोक मृत्युमुखी पडले व 15 लोक जखमी झालेत. कंत्राटदाराला वनविभागाच्या वाहनचालकाविना वाहन कसे देण्यात आले? मृतांमध्ये 16 वर्षीय प्रदीप भाऊराव राऊत याचा समावेश होता. बाल कायद्यांतर्गत या मुलाला कंत्राटदाराने कामावर नेलेच कसे? याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे. या संबंधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिले असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी परशुरामकर यांनी केली आहे.