खा.पटोलेंच्या शिष्टाईने कमकासुरवासी रामपूरात परतले

0
13

गोंदिया,दि.10ः भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील कमकासुर हे जंगलव्याप्त व आदिवासी गाव.त्यातही गोंदिया स्थित मध्यम पाटबंधारे प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या बावनथडी प्रकल्पाच्या बांधकामाच्यावेळी या कमकासुरवासियांन बंदुकीच्या धाकावर हलवून त्यांना तुमसर तालुक्यातीलच रामपूर येथे पुनवर्सित करण्यात आले होते.परंतु त्यांना पाहिजे त्या सोयी देण्यात व त्यांचा योग्य मोबदला देण्यात भंडारा जिल्हा प्रशासनासह मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता हे अपयशी ठरल्यानेच त्या गावकर्यानी दिवाळीपुर्वी परत आपला मोर्चा आपल्या मुळ गावी वळविला.आणि दिवाळी सुध्दा तिथेच साजरी केली.परंतु त्यांचे समाधान करण्यात व त्यांना परत रामपूरला आणण्यात अपयशी ठरलेल्या जिल्हाप्रशासनाचा नाकर्तेपणाच म्हणावे लागेल.त्यातच खासदार नाना पटोले यांनी 8 नोव्हेंबरला कमकासुरात पोचून त्यांच्या समस्या एैकून त्यांना दिले्ल्या शब्दावर ग्रामवासी पुनवर्सित जागेवर यायला तयार झाल्याने खासदार पटोलेंची शिष्टाई कामात आली.

मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी बांधव ५ आॅक्टोबर रोजी पुनर्वसित गाव सोडून आपल्या मूळगावी कमकासुरात परतले होते. आधी सुविधा द्या नंतरच घर वापसी अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली होती. त्यामुळे एक महिन्याहून अधिक दिवस या आदिवासी बांधवांना वनवास भोगावा लागला. अखेर खासदार नाना पटोले यांनी आदिवासी बांधवांची समजूत काढून जिल्हा प्रशासनाला सुविधा देण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे कमकासुरवासीयांचे अखेर पुनर्वसित गाव रामपूर येथे ८ नोव्हेंबर रोजी घर वापसी झाली.नागरी सुविधांचा अभाव असल्याने पूनर्वसित गाव सोडून कमकासूर या जंगलव्याप्त गावात आलेले गावकरी तब्बल महिनाभरानंतर रामपूर येथे परतले आहेत. खासदार नाना पटोले, जिल्हाधिकारी सुहास दिवसे,मध्यम प्रकल्प विभागाचे काही अधिकारी,तहसिलदार,उपविभागीय अधिकारी यांनी बुधवारी रामपूर येथे नागरी सुविधा पुरविण्याचे आश्वासन देत कमकासूर गावाला दत्तक घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर गावकऱ्यांची घरवापसी झाली आहे.आदिवासींचे जॉबकार्ड तयार करून गावातील रस्ते व स्मशानशभूमी तयार करून गावातच रोजगार निर्मिती, सरकारी जागेवर सामूहिक शेतीचा प्रकल्प राबविणे, वनहक्क दाव्यासाठी अर्ज सादर झाल्यास तो तत्काळ निकाली काढणे, यासह पूनर्वसनाबाबत विशेष अर्थसहाय्य पॅकेजमधील अवितरीत रक्कम तत्काळ आदिवासींना मिळणार आहे. गावात आर. ओ. प्लँटची निर्मिती, प्राथमिक शाळेचे डिजिटायजेशन, बचतगटांना रेशीमपालन, मधमाशी, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती आदींसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या गाळभरणीच्या वेळी कमकासूर या गावातील आदिवासी कुटुंबांना बंदुकीच्या धाकावर गावाबाहेर काढण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन तुमसर तालुक्यातील रामपूर येथे करण्यात आले आहे. मागील सात वर्षांपासून हे कुटुंब पुनर्वसनस्थळी राहत आहेत. परंतु, याठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा प्रशासनाने पुरविण्यात आलेल्या नाहीत.घर नाही, विजेची सोय नाही, धड रस्ते नाहीत, पाण्याची तर वानवा आहे. त्यांना टिनाच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत होते. रोजगाराचे साधन हिरावल्या गेल्याने बेरोजगारी निर्माण झाली. अखेरीस ५ ऑक्टोबर रोजी या आदिवासी कुटुंबांनी रामपूर सोडून कमकासूर येथे धाव घेतली. घनदाट जंगलात, हिंस्त्र प्राण्यांच्या सावटात आदिवासी जगत असताना कुणीही त्यांची दखल घेतली नाही. सरकार तथा प्रशासनाच्या विरोधात या आदिवासींनी ऐन दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी साजरी केली.
याबाबत खा. नाना पटोले यांनी आठ दिवसांपूर्वी गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बुधवारी पुनर्वसित ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी सोनुले, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम साळी, प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज, तहसीलदार बालपांडे व इतर गावकरी उपस्थित होते.