मद्यमुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व करा-श्रमिक एल्गारचे सुप्रिया सुळेना आवाहन

0
10

चंद्रपूर, दि.७: दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी मद्यमुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले आहे. हल्लाबोल आंदोलनादरम्यान यवतमाळ येथील महिलांना भेटून यवतमाळ जिल्हा दारूमुक्त व्हावा, या मागणीला खासदार सुप्रिया सुळे यांनी खंबीर पाठिंबा जाहीर केला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांची मागणी पूर्ण करेल, असे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर, श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी खा.सुप्रिया सुळे यांना पत्र पाठवून मद्यमुक्त महाराष्ट्रासाठी खा.सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी दारूबंदीला समर्थन जाहीर करताच, त्यांचा आदर्श घेऊन माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी ‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येताच एका दिवसात यवतमाळ जिल्हयाची दारू बंदी करू’, असे जाहीर करुन विधीमंडळात अशासकीय ठराव मांडण्याचे आश्वासनही दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी “आम्ही यवतमाळ जिल्हा दारूबंदीच्या प्रश्नावर येत्या अधिवेशनात प्रश्न मांडू’ असे वचन दिले, दारूबंदीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे श्रीमती गोस्वामी स्वागत केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी दारूबंदीला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रात दारूबंदीसाठी प्रचंड सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण तसेच राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मोठया पक्षांनी गोर-गरीब महिलांच्या या लढयाला भक्कम साथ दिल्यामुळे सर्वं महिलांच्या मनात ‘मद्यमुक्त महाराष्ट्राची’ आशा पल्लवीत झाली आहे, याकडे अॅड. गोस्वामी यांनी त्यांचे लक्ष वेधले.