24.2 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ शेकापचा १५ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

शेकापचा १५ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

0
27

गडचिरोली, दि.१३: शेतकरी व मजुरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी १५ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार आहे.शेकापचे ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख, सरचिटणीस आ.जयंत पाटील, आ.धैर्यशिल पाटील, आ.सुभाषअण्णा पाटील, आ.बाळाराम पाटील, रामदास जराते, रोहिदास कुमरे, महिला नेत्या जयश्री वेळदा हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. परंतु आतापर्यंत केवळ ८ हजार कोटी रुपयेच उपलब्ध करुन देण्यात आल्याने सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे सरकारच्या फसव्या धोरणांना विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शेकापने म्हटले आहे.

६० वर्षे व त्यापेक्षा जास्त्‍ा वय असलेल्या शेतकऱ्यांना एकरी १ हजार रुपये मासिक पेंशन सुरु करावे, सर्व शेतकऱ्यांचा विमा काढून सर्पदंश, वज्राघात, अपघात, आत्महत्या व रासायनिक औषधे फवारताना मृत्यू झाल्यास संबंधित शेतकरी व मजुरांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करावी, कृषिपंपांच्या वीजबिलाची वसुली बंद करुन २०११ पासून आतापर्यंतच्या वीजबिलाची रक्कम माफ करावी, विकास प्रकल्पांच्या नावाने शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी कवडीमोल भावाने संपादित करुन त्या भांडवलदारांच्या घशात घालणे बंद करावे, प्रलंबित वैयक्तिक वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, तसेच त्यांना सातबारा वाटप करावे, शेतकऱ्यांच्या मुलांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ वितरीत करावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे निमंत्रक रामदास जराते यांनी केले आहे.