पोलिसांनी अडविले तेंदूपानांचे ट्रक; दोषींवर कारवाईची शेकापची मागणी

0
7

गडचिरोली,दि.3:ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.

रामदास जराते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यंदा घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी स्वता: तेंदूपानांचे संकलन केले. या तेंदूपानांची राजोली, मुल येथील गोदामात साठवणूक करण्याकरिता आजपासून वाहतूक सुरू करण्यात आली. वाहतुकीकरिता वनविभागाकडून टी.पी.बूक घेऊन ग्रामसभेने संबंधित वाहनांना टी.पी.जारी केली. मात्र, सकाळपासून कसनसूर पोलिसांनी पोलिस ठाण्यासमोर दोन ट्रक तेंदूपानासह थांबवून ठेवले आहेत. एकीकडे एट्टापल्ली तालुक्यातील इतर ग्रामसभांनी तेंदूपत्ता न तोडल्याने लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतांना घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांचे ट्रक थांबविण्याचा प्रकार चिरीमिरीकरिता आहे.

त्यामुळे चिरीमिरीकरिता नाहक त्रास देणा-या संबंधित पोलिस अधिकाऱ्‍यावर पोलिस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी व ग्रामसभेला तेंदूपानांची वाहतूक करण्यास सहकार्य करावे, तसेच वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.