साकोली,दि.03ः-भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणुक हि नाना पटोलेंच्या निष्क्रिय कामगिरीच्या राजीनाम्यामुळे लागली. या निवडणुकीत खा. प्रफुल्ल पटेल सोबतच त्यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांनीही जोरदार प्रचार केले. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील लहान मोठे सर्व नेते मंडळी, लहानातला लहान गावखेड्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, शेतकरी संकटमोचन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागल्यामुळे मधुकरजी कुकडे खासदार झाले. याचे सर्व श्रेय हे भंडारा गोंदिया येथील कार्यकर्ते आणी जनतेचे असूनही नाना पटोले यांनी स्वत: श्रेय घेण्याचा सपाटा सुरू केला. याबाबत काही वृतपत्रातील बातमी वाचून कार्यकर्ते दुखावले असून हा दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा अपमान आहे. या अपमानाबाबत नाना पटोलेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, शेतकरी संकटमोचन संघटनेच्या कार्यकर्त्यांची माफी मागावी अशी मागणी शेतकरी संकटमोचन संघटनेचे संयोजक डाॅ. अजयराव तुमसरे यांनी केलेली आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करीत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप सोडली आणी भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक जनतेवर लादल्या गेली.2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केल्यामुळे नाना पटोले यांचा अहंकार वाढून काँग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपाच्या फैरी झाडल्या. प्रफुल्ल पटेल सारख्या बलाढ्य नेत्याला हरविल्यामुळे केंद्रातील भाजप सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पद नाहीच मिळाले. तर राज्यमंत्री पद मिळेलच या अपेक्षेने नाना पटोले यांचा भ्रमनिरास होऊन खासदार पदावरच समाधान मानावे लागले. नेमके याच कारणाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गडकरी सारख्या समांतर नेत्यावर आरोप करून खासदारकीचा राजीनामा दिला व भाजप सोडून काँग्रेसवासी झाले. नाना पटोलेंकडून राजीनामानाट्य पहिल्यांदाच झाला असेही नाही. या याधीही काँग्रेसचे आमदार असतांनाही काँग्रेस च्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने तत्कालीन काँग्रेस च्या मुख्यमंत्र्यावर आरोप करीत काँग्रेस सोडली होती हे विशेष.
नाना पटोले 20 वर्षापासून शेतकरी हा एकच मुद्दा घेऊन येथील जनतेला गोड बोलून निवडणूकांना सामोरे जातात परंतू विस वर्षापासून एकही शेतकर्यांचा प्रश्न नाना पटोले यांनी सोडविला नाही. एवढेच नाही तर साकोली तालुक्यात असंख्य शेतकर्यांचे आंदोलन, जिल्ह्यातील बेरोजगारांचे आंदोलन झाले त्यावेळी कधीही उपस्थित नव्हते. तसेच शेतकर्यांच्या उपोषण मंडपात साधी भेटही दिलेली नाही हे विशेष. तरीही स्वतःला आपल्याच कार्यकर्त्यांच्या मार्फत भुमिपुत्र म्हणवून घेतात. हे येथील जनतेचे दुर्दैव आहे.ओबिसी संग्राम परीषद नावाची संघटना काढून नाना पटोले यांना 15 वर्षे झाली. परंतु या संघटनेच्या माध्यमातून ओबीसी करीता कधीही रस्त्यावर उतरुन आंदोलन केलेले नाही हे सुध्दा जनतेने पचवित या पोटनिवडणुकीत त्यांना सहकार्य केले.मात्र कुकडेंच्या विजयात एकट्या पटोलेंचा वाटा नसून सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा वाटा असल्याचेही तुमसरे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.