तिरोडा,दि.09ः- शेतकर्यांना आवश्यक वीजपुरवठा हा केवळ प्रश्न माझा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना ८ ऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी ऊर्जामंत्री व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ८ दिवसात तोडगा काढणार असल्याचे आश्वासन आ. विजय रहांगडाले यांनी दिले.
तिरोडा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांना ८ तास वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी क्षेत्रातील शेतकर्यांनी ८ ऑगस्ट रोजी आ. विजय रहांगडाले यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान, आ. रहांगडाले यांनी आपण देखील एक शेतकर्याचा मुलगा असल्याने वीजपुरवठा व शेतीचा संबंधाची चांगल्याप्रकारे जाण असल्याचे सांगून प्रश्न माझा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना ८ तासाऐवजी १२ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेण्यासाठी मुंबई आजच जात असून त्यांच्यासोबत चर्चा करून शेतकर्यांची मागणी पटवून देऊन येत्या आठ दिवसात १२ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन आ. रहांगडाले यांनी शेतकर्यांना दिले.