३१ तलावांनी गाठली शंभरी

0
9

गोंदिया,दि.०३ : जिल्ह्यात मागील तीन दिवस बरसलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर मध्यम प्रकल्पाचे ३१ तलाव शंभर टक्के भरले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक तलाव ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला असून सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकक्तयांना दिलासा मिळाला आहे. पाणी टंचाईचे संकट सुध्दा काही प्रमाणात कमी झाले आहे. शंभर टक्के भरलेल्या मध्यम प्रकल्पामध्ये बोदलकला, संग्रामपुर व कटंगीचा समावेश आहे. लघू प्रकल्पात डोंगरगाव, गुमडोह, कालीमाटी, मोगरा, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी, उमरझरी, बेवारटोला यांचा समावेश आहे. तर जुन्या मालगुजारी तलावात भानपूर, चान्ना-बाक्टी, फुलचूर, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, खमारी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा पळसगाव (सौंदड) पालडोंगरी, पळसगाव (डव्वा) पुतळी, सौंदड व तेढा या तलावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघू व जुने मालगुजारी तलाव जे सिंचन व पिण्याच्या पाण्यायोग्य आहे. त्यांची संख्या ६५ वर आहे. या तलावांत आतापर्यंत ७२.६८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या तलावांत २७.३२ टक्के अधिक पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांतील ९ तलावांमध्ये सध्या ७७.३० टक्के, लघू प्रकल्पाच्या २२ तलावांत ६७.६८ टक्के तर ३८ जुन्या मालगुजारी तलावांत ८१.५४ टक्के पाणीसाठा आहे.
मात्र काही तलावातील पाणीसाठ्यात अद्यापही वाढ झालेली नाही. मध्यम प्रकल्पातील चोरखमारा तलावात ३८.१५ टक्के, भदभद्या तलावात ५२.१८ टक्के, रिसाला २९.८४ टक्के, ओवारा ४६.३२ टक्के तर जुन्या मालगुजारी तलावांतील बोपाबोडी २२.७३ टक्के, चिरचाळबांध ४३.६५ टक्के, चिरचाडी तलावात ४९.६२ टक्के, गिरोला ३०.२९ टक्के, कोसबीबकी १७.८८ टक्के, ककोडी ५२.०६ टक्के, खोडशिवनी ३५.०३ टक्के तर निमगाव ५३.२१ टक्के पाणीसाठा आहे.