जलयुक्तमुळे १ लाख ८७ हजार हेक्टर संरक्षित सिंचन

0
19

नागपूर,दि.0८ः- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रथम वर्षापासून १६८३गावांची निवड झाली होती. त्याअंतर्गत १४९९ गावे जल परिपूर्ण झाली आहेत. या अभियानामुळे २ लाख १२ हजार ४४९ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामधून २ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन निर्माण झाले असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, यावर्षी या अभियानांतर्गत विभागत ११३९ गावांची निवड झाली असून सर्व गावांचे गाव आराखडे सुद्धा तयार झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात माध्यम संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. संजीव कुमार बोलत होते. या कार्यक्रमाचे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, रोहयोचे उपायुक्त के. एन. के.राव, नियोजन उपायुक्त कृष्णा फिरके आदी उपस्थित होते. विकासाच्या विविध क्षेत्रात नागपूर विभागात चांगले काम झाले असून, यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध विकासकामे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. आरोग्य, कृषी तसेच महसूल विभागासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागासोबत बैठक घेऊन विकासाची कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विभागात नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून पुरेसा पडणार्‍या पावसामुळे भूजलाचे पुनर्भरण व जमिनीवर साठवणूक वाढवून संरक्षित सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी सीसीटी, दगडी बांध,गॅबियन बंधारे, सिमेंट बंधारे आदी कामे जलयुक्तअंतर्गत घेण्यात आले आहेत. विभागात असलेल्या माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून यामुळे सुमारे ३00 वर्षांपूर्वीच्या काळात बांधलेले ६ हजार ७४0 माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. मागील दोन वर्षांत १ हजार ८६३ कामे सुरू झाली असून त्यापैकी १ हजार ६१६ कामे पूर्ण झाली आहेत. अकरा हजार विहिरी बांधकामांतर्गत विभागात ११ हजार ४९८ कामे सुरू झाले आहेत. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून संपूर्ण कामाचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. महाऑनलाईन पोर्टलवर ८ हजार १६८ विहिरींची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी सुरू असून मजुरांची उपस्थिती तसेच निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा व विहिरींची कामांमध्ये राज्यात विभागाची उत्कृष्ट कामगिरी असल्याची यावेळी सांगितले. विभागात सरासरी पावसाच्या ९३ टक्के पाऊस झाला आहे.पीक पेरणी, कर्जवाटप आदी. बाबतही विभागीय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.