रेल्वेने कटून दोन युवकांचा मृत्यू

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.03: गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीने कटून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकावर घडली.  गोंदियावरुन सायंकाळी ५ वाजता सुटणारी गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडी शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकावर पोहचली. दरम्याच याच रेल्वे गाडीने दोन युवक कटले. यापैकी एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुसऱ्याला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दोन्ही मृतक युवकांची ओळख पटली नसून त्यांच्याजवळ ब्रम्हपुरी येथे जाण्याचे रेल्वेचे तिकीट आढळले. त्यामुळे ते ब्रम्हपुरी येथील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी अर्जुनी मोरगाव येथील आठवडी बाजार असल्याने तालुक्यातील व परिसरातील नागरिक व विक्रेते बाजारासाठी येथे येतात. हे दोन्ही युवक देखील बाजारासाठी आले असल्याचे बोलल्या जाते. दरम्यान याप्रकरणी गोंदिया रेल्वे पोलिसांनी नोंद घेतली असून मृतकांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.