संविधान जनतेपर्यंत पोचविणे काळाची गरज : पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय

0
19

नागपूर,दि.28ः- परदेशात भारताची प्रतिष्ठा ही भारतीय संविधानामुळे असून अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृती देशात रुजणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी केले.
केंद्रीय खाण मंत्रालयांतर्गत अंतर्गत सिव्हिल लाईन्स स्थित आय.बी.एम. (भारतीय खाण ब्युरो) मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या जयंती महोत्सवाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खाण नियंत्रक (कंट्रोलर ऑफ माईन्स) पी. शर्मा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गौतम कांबळे उपास्थित होते.
व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन प्रेम व विचारामुळे येते. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्याने कारागृहातील कैद्यांच्याही विचारात परिवर्तन झाले, असे मत डॉ. उपाध्याय यांनी यावेळी मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या ग्रंथात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. सायमन कमिशन, साऊथ ब्यूरो कमिटीसमोर डॉ. आबेडकर केवळ शोषित समाजाचे नेते म्हणून नव्हे तर एक विशेषतज्ज्ञ व अर्थशास्त्री म्हणून गेले होते, अशी माहिती डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला संविधान निर्माते, समाजसुधारक असे कंगोरे असले तरी त्यांचे व्याक्तिमत्त्व शिक्षणामुळे अधिक प्रगल्भ झाले होते. त्यांचे शिक्षणविषयक विचार आज आपण आत्मसात करायला हवे, असे मत पी. शर्मा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषाणातून व्यक्त कले.यावेळी आयबीएमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती समितीचे सचिव रोकडे, बेग व आयबीएम कार्यालयाच्या विविध आस्थापनामधील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. संचालन अशोक गवई यांनी केले.