जोडाबोडी तलावातील हजारो मासे मृत्युमुखी

0
19

आमगाव,दि.28ः-येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामाजवळील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मृत पडल्याचे चित्र शुक्रवारी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भवरिया व संस्थेचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाºया रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परीसरातील जोडाबोडी तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था आमगाव ( रिसामा) या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव लिलावाने भाडे तत्वावर घेत आहेत. तलावात मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजारण करतात. अनेक अडचणी वर मात करून ते हा मत्स्य व्यवसाय करतात. शुक्रवारी सकाळी आजूबाजूला असणाºया नागरिकांनी तलावातील काही मासोळी मरण पावलेल्या असल्याचे सांगितले. परंतु रात्रभरात संपूर्ण तलावातील हजारो मासे मृत पावल्याचे त्याना शुक्रवारी पहाटे माहीत झाले. सकाळी ५ वाजल्यापासून मृत मासे काढण्याचे काम केले असता अंदाजे १० ते १५ क्विंटल मासे मृत पावल्याचे दिसून आले त्यामुळे संस्थेचे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणी सुद्धा दुषित झाले आहे. तलावातील पाणी साठवन क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणी साठा असून सुद्धा मासे अचानक मरण पावलेल्या मुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा उष्णतेमुळे मासे मृत्यू पावले असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊलाल भवरिया, सचिव दुर्गाप्रसाद रहेकवार व संचालक मंडळांनी मत्स्य विभागा कडे मागणी केली आहे.