१२ तास वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील-ऊर्जामंत्री बावनकुळे

0
4

भंडारा,दि.24ः-भंडारा गोंदिया मतदारसंघात पावसाच्या अभावामुळे धानशेतीवर संकट ओढवलेले आहे. तसेच कडक उन्हाळा आणि कमी पाऊस पाणी यामुळे सध्या उपलब्ध असलेला विजेचा ८ तासाचा अवधी शेतकर्‍यांना सिंचनासाठी कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन विजेची उपलब्धता सध्याच्या ८ तास ऐवजी वाढवून ती १२ तास करण्यासंबंधी सकारात्मक प्रयत्न करणार असून त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत देखील चर्चा करणार असल्याची ग्वाही ऊजार्मंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांनी दिली असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी कळविले आहे.
वीजेचा पुरवठा १२ तास करण्याची मागणी खासदार सुनील मेंढे यांनी एका पत्राद्वारे राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना केली होती. तसेच या विषयाची तत्परता लक्षात घेऊन आज दिल्लीत संसदीय अधिवेशनात असताना ऊजार्मंत्री बावनकुळे यांचेशी भ्रमणध्वरून संपर्क झाल्याचे देखील मेंढे यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकरी सिंचनाच्या सोयीमुळे पिक वाचवू शकतात ही बाब लक्षात घेऊन विहीरी, गोसे, बावनथडी, पेंच या धरणाच्या व इतर सिंचन योजनेमुळे पिकाला नियोजनबद्ध पध्दतीने पाणी देणे सुरू आहे, अशी माहिती देखील खासदार मेंढे यांनी दिली आहे.