पत्रकार परिषदेमध्ये केले माध्यमांना आवाहन
गडचिरोली,दि.06 : माध्यमांनी पेड न्यूज बाबत थोडी सतर्कता बाळगावी तसेच उमेदवार, मतदार व प्रशासनाने जिल्हयातील निवडणुका पारदर्शक राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मत निवडणूक निरिक्षक प्रवीण गुप्ता यांनी व्यक्त केले. गडचिरोली जिल्हयामध्ये निवडणूक आयोगाकडून नेमलेल्या निवडणूक निरिक्षकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणुक निरीक्षक आर एस धिल्लन, युरिंदर सिंग, हिंगलजदन, वी आर के तेजा व लव कुमार उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ- ठुबे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नायब तहसीलदार चुडगुलवार उपस्थित होते.
प्रत्येक मतदार संघासाठी जनरल 1 व पोलीस 1 अशा दोन आय.ए.एस. व आय.पी.एस.दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त संपुर्ण जिल्हयासाठी अतिरीक्त एक खर्च निरीक्षक नेमण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. सर्व निवडणूक निरिक्षक जिल्हयात दाखल झाले असून निवडणूक तयारीबाबत कामकाज पाहणे सुरू झाले आहे.
आम्हाला संपर्क करा – निवडणूक निरीक्षक : यावेळी त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की आम्हाला आचार संहिता भंग, निवडणुक प्रक्रियेबाबत तक्रारी तसेच उमेदवारांकडून होत असलेल्या चुकिंच्या पद्धतीबाबत आमच्या मोबाईलवर संपर्क करा. यासाठी त्यांनी मोबाईल संपर्क क्रमांक दिले आले आहेत. यामध्ये आरमोरी विधानसभेसाठी आर.एस.धिल्लन (7588589355) व युरिंदर सिंग (8275136355) हे जनरल व पोलीस निवडणूक निरीक्षक आहेत. ते अनुक्रमे शासकिय विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर व पोलीस विश्रामगृह गडचिरोली येथे वास्तव्यास आहेत. गडचिरोली विधानसभेसाठी प्रविण गुप्ता (8275404375) व हिंगलजदन (8275890375) हे जनरल व पोलीस निवडणूक निरीक्षक आहेत. ते अनुक्रमे शासकिय विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर व पोलीस विश्रामगृह गडचिरोली येथे वास्तव्यास आहेत. अहेरी विधानसभेसाठी वीआरके तेजा (9405992709) व लव कुमार (9405990195) हे दोघेही वन विभाग, विश्रामगृह, आलापल्ली येथे वास्तव्यास आहेत. तसेच सर्व तीनही विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक खर्च या विषयासाठी अभ्र घोष (8275237155) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेही गडचिरोली येथील शासकिय विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर येथे वास्तव्यास आहेत. संबंधित निवडणुक निरिक्षकांनी नागरीकांना भेटण्यासाठी सकाळची वेळ 9.00 ते 11.00 दिलेली आहे.पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांद्वारे त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की c-vigil मोबाईल ॲप, वोटर हेल्पलाइन मोबाईल अॅप, 1950 टोल फ्री क्रमांक यांचा वापर करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी राबवावी.
जिल्ह्यातील मतदारांना मतदानाविषयी माहिती असणाऱ्या चिठ्ठ्या ९ ऑक्टोबर पासून वाटप करण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार आहे असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले जिल्ह्यात 99.41 टक्के लोकांना मतदान ओळखपत्र दिलेले आहे. तरी मतदानावेळी ते सोबत आणावे. जर ते नसेल तर आयोगाने ठरवून दिलेल्या इतर अकरा प्रकारच्या ओळखपत्र पैकी एक तरी ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे.




